• Thu. Mar 19th, 2026
    हत्ती रूतला, बार सजला, परिसरात बिअरच्या बाटल्या, पुणे विद्यापीठात चाललंय काय?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हत्ती तलाव पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण प्रकल्प रखडला असून, भूमिपूजनाच्या दीड वर्षानंतरही प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे. याचा फायदा काही व्यक्तींकडून घेण्यात येत आहे. या व्यक्ती रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तलावाच्या ठिकाणची जागा दारू पिण्यासाठी आणि मोकळ्या जागेत पार्ट्या करण्यासाठी वापरत आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठात हत्ती रूतला, बार सजला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते हत्ती तलाव पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचा शुभारंभ २२ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आला. हे काम कर्वे समाज सेवा संस्था आणि कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार होते. त्यानुसार कामाला सुरुवात झाली. मात्र, अजूनही प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याचे चित्र आहे. या परिसरात खोदकाम आणि बगिच्याचे प्राथमिक स्वरुपातील काम पूर्ण झाले आहे.

    या परिसरात काही कामे सुरू असल्याने, राडारोडा विखुरल्या अवस्थेत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यक्ती दररोज रात्री मद्यपान करीत असून, रिकाम्या बाटल्या, वेफर्सची पाकिटे आणि सिगारेट्सची खाली पाकिटे फेकून परिसर घाण करीत आहे. या परिसराच्या आजुबाजूला एनसीसीएसचे कार्यालय, कॉलनी आणि विद्यापीठातील सेवक वसाहतीच्या इमारती आहेत. या संपूर्ण प्रकाराकडे पुणे विद्यापीठात सकाळी आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनीही लक्ष वेधले आहे. हे काम कधीपर्यत पूर्ण होणार, अशी विचारणाही केली आहे. मात्र या प्रकाराबाबत विद्यापीठाच्या वतीने कोणीही अधिकृतपणे प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.

    वृक्षारोपण केलेल्या झाडांकडेही दुर्लक्ष?

    या परिसरातच विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत ७५ झाडे लावण्यात आली. मात्र, या झाडांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे, ही झाडे सुकत असल्याचे चित्र आहे. या झाडांना कोणतेही कम्पाउंड नाही. त्यामुळे विद्यापीठाने या झाडांकडे वेळीच लक्ष न दिल्यास, झाडे मरतील, असे चित्र निर्माण झाले आहे.

    प्रकल्पात काय होणार होते

    या संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण होणे अपेक्षित होते. या परिसरातच नक्षत्र उद्यानाची निर्मिती होणार होती. त्याचप्रमाणे कारंजी उभारण्यात येणार होती. फिरण्यासाठी प्रशस्त ट्रॅक निर्माण करण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. या प्रकल्प तातडीने पूर्ण न झाल्यास, हत्ती तलावही जीर्ण अवस्थेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed