• Sat. Sep 21st, 2024

शाळा दत्तक म्हणजे खासगीकरण नव्हे, दीपक केसरकरांनी पुण्यात सांगितला योजनेमागील उद्देश

शाळा दत्तक म्हणजे खासगीकरण नव्हे, दीपक केसरकरांनी पुण्यात सांगितला योजनेमागील उद्देश

म. टा. प्रतिनिधी, पुणे :‘सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) निधीतून शाळा सुधारणांचे प्रयोग वाबळेवाडीसह काही ठिकाणी यशस्वी झाले. सरकारी शाळांमध्ये होणाऱ्या प्रयोगांना सरकारी प्रणालीचा भाग करण्यासाठी शाळा दत्तक योजना आहे. शाळांमधील पायाभूत आणि शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यासाठी हा निर्णय असून, त्यात खासगीकरणाचा संबंध नाही. शाळेचे नावही बदलण्यात येणार नाही; तसेच शाळा दत्तक घेणाऱ्यांचा समावेश कोणत्याही निर्णय प्रक्रियेत नसेल’, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी दिले.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमां’तर्गत (एनआयएलपी) राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर केसरकर बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक अमोल येडगे, माध्यमिक शिक्षक संचालक संपत सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, योजना विभागाचे संचालक महेश पालकर, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी आदी उपस्थित होते.

समूहशाळांचा निर्णय शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावर घाव घालणारा?, शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांच्याशी चर्चा

केसरकर म्हणाले की, परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये (पीजीआय) राज्याची कामगिरी सुधारण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. सर्व मंडळांच्या शिक्षणपद्धतींचे एकत्रीकरण करून, राज्यासाठी आदर्श शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम विकसित केला पाहिजे. शिक्षणात विषय समजून घेऊन, प्रयोग करणे महत्त्वाचे आहे. वारंवार प्रयोग करण्यासाठी विद्यार्थी हे ‘गिनिपिक’ नाहीत. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांची शाळा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रम हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. नवसाक्षरांना आठवीतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या समकक्ष न्यायचे आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांचीच आहे, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारचे नवसाक्षरता अभियान हे निरक्षरांना साक्षर करण्यासाठी राज्यात राबवले जाणार आहे. निरक्षरांना साक्षर करणे हे शैक्षणिक काम आहे. मात्र, राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या बहिष्कारामुळे नवसाक्षरता अभियानासाठी निरक्षरांचे सर्वेक्षण सुरू होऊ शकलेले नाही, अशी माहिती डॉ. पालकर यांनी दिली.

शाळा बंद करणार नाही

राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येत असल्याचा गवगवा करण्यात येत आहे. मात्र, तसे अजिबात नाही. एखाद्या गावात हाकेच्या अंतरावर चार-पाच शाळा असतील आणि त्या शाळांमध्ये कमी विद्यार्थी असतील, तर समायोजन करण्यात येईल. दुर्गम भागात केवळ एकच शाळा असल्यास, ती बंद होणार नाही. त्याचप्रमाणे गावातील अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून, त्यामार्फत ज्युनिअर, सिनीअर केजीचे वर्ग सुरू करण्यात येईल. त्यामुळे गावामध्ये शाळा राहणार असल्याचे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले.

‘एससीईआरटी’ने ‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम घ्यावा किंवा त्याच्या समकक्ष असणारा अभ्यास तयार करावा. सीबीएसईच्या गणित आणि विज्ञान विषयांच्या अभ्यासक्रमाची आपण राज्यात अंमलबजावणी करू शकतो.

– दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री

लाखोंची गर्दी जमवली, सभा गाजवली, जरांगे पाटलांचं ‘पाऊल पडती पुढे’, उद्यापासून पुन्हा मोहिमेवर!

राज्यातील १० टक्के जनतेला वाचता येत नाही

देशातील चांद्रयान मोहीम यशस्वी झालेली असताना, राज्यातील साधारण १० टक्के जनतेला लिहिता वाचता येत नाही, अशी धक्कादायक परिस्थिती आहे. शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी केवळ शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरती मर्यादित नाही. समाजातील प्रत्येक घटकाला शिकवणे हे काम आहे. व्यवस्थेच्या अपयशामुळेच अजून समाजात निरक्षर आहेत. नवभारत साक्षरता कार्यक्रम हा राज्यासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. देशातील इतर राज्यात तो यशस्वीप्रमाणे राबविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात येईल, असे मांढरे यांनी सांगितले.
पाकिस्तानचा रडीचा डाव, भारतीयांची तक्रार थेट आयसीसीला करणार, नेमकं घडलं तरी काय पाहा…

मुला-मुलींच्या शाळा एकत्रित हव्यात

नवीन शैक्षणिक धोरणात मुला-मुलींच्या सहशिक्षणावर ( को-एज्युकेशन) भर दिला आहे. त्यामुळे मुला-मुलींच्या एकत्र शाळा असल्या पाहिजेत. कमी पटसंख्येच्या शाळांपेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांतील मुलांचे अधिक चांगले शिक्षण होते. त्यासाठी समूह शाळा ही संकल्पना उपयुक्त आहे. मात्र, कोणत्याही शाळा बंद करण्याचे धोरण नाही. त्याचप्रमाणे शिक्षकांची पदेही कमी होणार नाही. ही बाब लोकांना पटवून सांगायला हवी, असे देओल यांनी सांगितले.

नेदरलँडच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत भारतीय चाहते; वर्ल्डकपमध्ये होणार का दुसरा मोठा चमत्कार, पाहा काय आहे समीकरण

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed