• Sat. Sep 21st, 2024

महामुंबईत १,५२८ मुले शाळाबाह्य; पालघर जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण, काय सांगते आकडेवारी?

महामुंबईत १,५२८ मुले शाळाबाह्य; पालघर जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण, काय सांगते आकडेवारी?

मुंबई : शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मिळून १,५२८ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. यातील एकट्या पालघर जिल्ह्यात ९२८ विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आले असून यातील तब्बल ६७६ मुले ही डहाणू तालुक्यातील आहेत. या शाळाबाह्य मुलांमधील २६३ विद्यार्थी आतापर्यंत कधीच शाळेत गेली नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागाने यातील ५८२ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले असून मोहिमेनंतर अद्यापही मुंबई विभागातील ९३२ मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत.

राज्यातील शाळाबाह्य, स्थलांतरीत आणि शाळांमध्ये नियमित उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान मोहीम राबविली होती. या मोहिमेत ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली. शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १,५१० मुले शाळाबाह्य असल्याचे आढळले असून त्यामध्ये ७४२ मुलांचा, तर ७६८ मुलींचा समावेश आहे. शिक्षण विभागाने राबविलेल्या या मोहिमेदरम्यान त्यातील २६३ मुले आतापर्यंत कधीच शाळेत गेली नसल्याचे समोर आले आहे. यातील २६२ मुलांना शाळेत घालण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. तर शाळेत अनियमित असलेले १,२४१ मुले सर्वेक्षणात सापडली असून त्यांच्यातील ९२४ मुले अद्यापही शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असल्याचे दिसून आले आहे. पालघर जिल्ह्यात आढळून आलेल्या ९२८ मुलांपैकी केवळ ७१ मुलांनाच शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. त्यातून पालघरमधील सर्वाधिक मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असून हा आकडा ८५७ एवढा आहे.

दरम्यान मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सर्व शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यात यश आल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. या मोहिमेदरम्यान शाळाबाह्य मुलांचे सर्वाधिक प्रमाण ग्रामीण भागात आढळून आले आहे. मोहिमेदरम्यान शाळाबाह्य सापडलेल्या एकूण मुलांपैकी ग्रामीण भागातील १०१२ मुले शाळाबाह्य होती. तर शहरी भागात ४९८ मुले शाळाबाह्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणातून बाहेर पडू नयेत, यासाठी शिक्षण विभागाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
अडीच हजार शिक्षकांवर संक्रात? समूह शाळा प्रकल्पामुळे तीन जिल्ह्यांतील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात
जिल्हानिहाय शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण
जिल्हा – मुले – मुली – एकूण
मुंबई – ७९ – ८५ – १६४
ठाणे – २०६ – १७४ – ३८०
रायगड – १६ – २२ – ३८
पालघर – ४४१ – ४८७ – ९२८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed