आमचा आग्रह हा राहील की, जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचं राज्य यावं, अशी आमची भूमिका आहे. जनमानसात आमचा परिणाम दिसतोय त्याचं मतामध्ये परिवर्तन झालं तर सत्ता येईल, असं शरद पवार म्हणाले.
भाजपसोबत जावं हा आग्रह काही लोकांचा होता, असं शरद पवार म्हणाले. छगन भुजबळ यांचा प्रस्ताव सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करावं असा होता. छगन भुजबळ तुम्ही जिकडे आहात तिकडे मी आहे असं म्हणाले होते. त्यानंतर ते दुसऱ्या बाजूला गेले, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार घालणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यासंदर्भात विचारलं असता शरद पवार यांनी ते स्वप्न असून ते घडणार नसल्याचं म्हटलं.
देशाचं चित्र हे भाजपच्या विरोधी आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा या राज्यात भाजपची सत्ता नाही. गोव्यात नव्हतं, तिथं फोडाफोडी करुन राज्य आलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, तिथं फोडाफोडी करुन सत्तेत आले. गुजरात भाजपकडे आहे. मध्य प्रदेशमध्ये फोडाफोडी करुन सत्तेत आले. राजस्थान, पंजाब, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. देशाची यादी बघितली तर ७० टक्के राज्यात भाजप नाही. यापुढेही अशीच स्थिती होईल, असं शरद पवार म्हणाले.
भाजपकडं मोठ्या प्रमाणावर राज्य राहिली नाहीत तर लोकसभेत त्याचा परिणाम दिसून येईल, असं शरद पवार म्हणाले. लोकसभेसाठी इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा असावा असं काही नाही. १९७७ ला देखील लोकांपुढं चेहरा नव्हता. परिवर्तन पाहिजे पर्याय पाहिजे अशी लोकांची भूमिका होती. आता देखील विविध राज्यात लोकांची भाजप नको पर्याय हवा अशी भूमिका असल्याचं शरद पवार म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News