• Fri. Mar 13th, 2026

    अंबाझरी तलावाची भिंत केव्हाही फुटू शकते, नागपूरवर मोठ्या संकटाची टांगली तलवार!

    अंबाझरी तलावाची भिंत केव्हाही फुटू शकते, नागपूरवर मोठ्या संकटाची टांगली तलवार!

    नागपूर : अंबाझरी तलावाची भिंत केव्हाही फुटू शकते, हा धोका वर्तवूनही आता सहा वर्षे झाली. तलावाला मजबुती देण्यासाठी २१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते. सिंचन विभागाकडे या तलावाच्या मजबुतीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत, मात्र ज्यांच्या मालकीचा हा तलाव आहे, ती मनपाच गंभीर नाही’, असा ठपका सिंचन विभागाने ठेवला आहे. ‘मटा’ने तलावाला भेट दिली असता असुरक्षित तलावाच्या अनेक खुणा येथे आढळून आल्या.

    अंबाझरी तलाव नागपूरची ओळख आहे. मात्र, या तलावाचे आयुष्य संपले असल्याचे धक्कादायक निरीक्षण ‘मेरी’ (संकल्पन, प्रशिक्षण जलविज्ञान, सुरक्षितता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था) या संस्थेच्या महासंचालकांनी सहा वर्षांपूर्वी १६ ऑगस्ट २०१७ रोजी नोंदविले होते. तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. सिंचन विभागाच्या २१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मनपाच्या स्थायी समितीने तीन वर्षांपूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली होती. खर्च अधिक असल्याने प्राधान्यक्रम ठरवून तीन टप्प्यांत हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ४ कोटी ५० लाख रुपये खर्चून विवेकानंद पुतळ्याजवळ सांडव्याचे काम करण्यात आले आहे. मंदिराच्या बाजूने भिंतही तयार केली आहे, असे सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रांजली टोंगसे यांनी सांगितले.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सिंचन विभागाचा संदर्भ देत अंबाझरी तलावाची भिंत केव्हाही पडू शकते, हे शनिवारी सांगितले. या तलावाची पाणी साठवणूक क्षमता वाढविणे शक्य आहे. मात्र, वाढलेल्या पाण्याचा प्रवाह रोहण्यासाठी भिंत मजबूत आहे का, हा प्रश्न आहे. शहरात मनपा, नासुप्र, मेट्रो, पीडब्ल्यूडी, सिंचन विभाग अशा विविध यंत्रणा आहेत. कुणी काय काम करावे, याबाबत स्पष्टता येण्याची गरज असून बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे गडकरींनी सांगितले.

    सिंचन विभाग म्हणतो…

    -अंबाझरी तलाव सिंचन विभागाच्या मालकीचा असता तर आतापर्यंत काम पूर्ण झाले असते. महापालिकेने या कामासाठी निधी देणे अपेक्षित आहे. मात्र, पत्रव्यवहार करूनही काहीच उत्तर दिले जात नाही.
    -मजबुतीचे काम करण्यासाठी तलाव पूर्ण रिकामा करावा लागेल, मनपाने तशी कार्यवाही करावी.
    -धरणावर लावण्यात आलेल्या झाडेझुडपांमुळे धरणातून गळती होऊ शकते. त्यामुळे ही झाडेझुडपे त्वरित काढून टाकण्यात यावी, असे मेरीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. सिंचन विभागाकडूनही ही बाब मनपाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र, अद्याप मनपाने ही झाडे तोडण्याबाबतही कोणताच निर्णय घेतला नाही.
    -धरणाच्या भिंतीला मजबुती देण्यासाठी मेट्रो रेल्वेने महापालिकेला सुमारे चार वर्षांपूर्वी १ कोटीचा निधी दिला. मेट्रो रेल्वेचे अंबाझरी तलावाजवळचे काम केव्हाचेच पूर्ण झाले. या मार्गावरून मेट्रोही धावत आहे. मात्र अंबाझरीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
    -अंबाझरी तलाव व नाग नदीमुळे निर्माण झालेल्या स्थितीनंतर प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भविष्यातील धोके रोखण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील, यासंदर्भात लवकरच आढावा घेण्यात येईल. त्याचबरोबर अंबाझरी तलावाच्या दृष्टीने इतर विभागांशी चर्चा करू उपाययोजना करण्यात येतील, अशीही माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

    याचाही करावा लागेल विचार

    -तलावाच्या भिंतीच्या मजबुतीकरणासाठी ४ कोटी ७९ लाख रुपये खर्च येणार आहे. मातीकाम आणि भिंतीला दगडाचे पिचींग करावे लागेल.
    -तलावाच्या भिंतीवरील झाडांचे मूळ खोलवर पसरले असतील. त्यामुळे तज्ज्ञांची समिती नेमून ही झाडे कशी तोडावी, हे ठरवावे लागेल. मुळा तशाच ठेवल्या तर धोका होऊ शकतो.
    -तलावाच्या पायथ्याला खड्डे करून अनेकजण माती घेऊन जातात, यामुळेही धोका निर्माण झाला आहे.
    -तलावाच्या परिसरात असलेली विहीर बुजवावी लागेल.
    -मनपा आताच कामाला लागली तर दिवाळीपर्यंत सिंचन विभागाचे काम सुरू होऊ शकते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed