• Sat. Jun 13th, 2026
    थेट रूग्णांच्या जीवाशी खेळ; शून्य गुणांवरही एमडी, एमएस डॉक्टर होता येणार ?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे

    देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना (एमडी, एमएस) प्रवेशासाठी लागणाऱ्या ‘नीट पीजी’ प्रवेश परीक्षेतील पात्रता गुणांचे कटऑफ गुण ५० पर्सेंटाइलहून थेट शून्यावर आणले आहेत. महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहणार असल्याने, हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवेश परीक्षेत पात्रता गुणही न मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही थेट एमडी, एमएस, एमडीएस अशा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. मात्र, अशा निर्णयांमुळे भविष्यात रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध होतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

    नीट पीजी प्रवेश परीक्षेच्या पात्रता गुण ५० पर्सेंटाइलहून शून्यावर आणल्याची माहिती मैडिकल कौन्सिल कमिटीने परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे. देशातील एमडी, एमएस, एमडीएस अशा अभ्यासक्रमांना नीट पीजी प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश मिळतो. पात्रतेसाठी लागणाऱ्या गुणांचे पर्सेंटाइल कमी करावे, अशी मागणी काही वैद्यकीय संघटनांनी केली होती. त्यानुसार एमसीसीने हा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, हा निर्णय जाहीर करतांना, भविष्यातील डॉक्टरांच्या कार्यकुशलतेवर परिणाम होणार नाही, याची चाचपणी एमसीसीने केली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता नीट पीजीच्या प्रवेश परीक्षेत अपेक्षित पात्रता गुण न मिळालेले विद्यार्थी, एमएडी, एमएस अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र झाले आहे. या विद्यार्थ्यांसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया आणि महाविद्यालयांच्या पर्यायांचे पसंती क्रम भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना, पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासणार नाही. त्यांना पर्यायांमध्ये अदलाबदल करता येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीचे नवे वेळापत्रक एमसीसीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी एमसीसीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    शून्य गुणांवर प्रवेश

    नीट पीजी २०२३ चे खुल्या गटासाठी पात्रता गुणांचा कटऑफ ५० पर्सेंटाईल, पीडब्ल्युडीसाठी ४५ पर्सेंटाईल, तर आरक्षित जागांसाठी ४० पर्सेंटाईल होते. हे गुण अधिक असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता; तसेच महाविद्यालयांमध्ये जागाही रिक्त राहतील, असा दावा संघटनांनी केला होता. त्यानंतर हे गुण थेट शून्यावर आणण्यात आले आहे. मात्र, अशा प्रकारे गुण शून्यावर आणून, एमसीसीला काय साध्य करायचे आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

    महाविद्यालयांसाठी निर्णय; रूग्णांच्या जीवाशी खेळ

    वैद्यकीय महाविद्यालयांच्या रिक्त जागांची काळजी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. प्रवेशासाठी गुणांची पात्रता ५० वरून शून्य करण्यात येणार असेल, तर नीट प्रवेश परीक्षेच्या मूळ हेतुला बगल देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमातील शैक्षणिक दर्जा खालावणार असून, रूग्णांवर उपचार करण्यासाठी कुशल तज्ज्ञ डॉक्टर तयार होणार नाहीत. त्यामुळे हा एकप्रकारे थेट रूग्णांच्या जीवाशी खेळ आहे. अशा प्रकारचे निर्णय सहन केले जाणार नाहीत, असा इशारा युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed