चंद्रपूर : यंदाच्या वर्षी मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. घराघरात आज बाप्पा विराजमान झाले. वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती मूर्तिकारांनी बनवली. गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत होत असताना ‘ श्रीगणपती ‘ लिहिलेल्या चांदीच्या नाण्याची आठवण इतिहासकारांना होत असते. अतिशय दुर्मिळ असलेलं हे नाणं मराठा साम्राज्यातील आहे. मिरज संस्थानाचे पटवर्धन यांनी या नाण्याची निर्मिती केली होती, अशी माहिती इतिहास अभ्यासक अशोक ठाकूर यांनी दिली आहे.
गणेशोत्सव म्हटलं की खास आकर्षण असतं ते वेगवेगळ्या मूर्तीचं. अनेकजण आपल्याला हवी तशी मूर्ती विकत घेत असतात. अशात इतिहासात दुर्मिळ ठरलेल्या चांदीच्या नाण्याची आठवण हमखास होत असते. ‘श्रीगणपती’ असं लिहिलेलं हे नाण मराठा साम्राज्यातील आहे. १७५९ ते १८०६ हा मुगल बादशहा शाह आलम (द्वितीय) यांचा कार्यकाळ होता. त्यावेळी मिरज संस्थानाचे पटवर्धन हे मराठी शासक होते. त्यांचे आराध्य दैवत गणपती होते. त्यांनीच या चांदीच्या ‘श्रीगणपती’ नाण्याची निर्मिती केली.
काय लिहिलं आहे नाण्यावर…
काय लिहिलं आहे नाण्यावर…
११.३४ ग्राम वजनाचे हे नाणे मिरज संस्थानचा पटवर्धन यांनी पेशवे यांच्या विषयी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी बनविले होते. या नाण्याच्या समोरील बाजूस श्रीगणपती आणि मागच्या बाजूस शाह आलम बादशाह गाजी आणि हिजरी वर्ष १२०२ अंकित आहे. पेशव्यांना मान देण्यासाठी पंतप्रधान’ असे नमूद आहे.
फारशीमध्ये ‘मैमनत मानुस’ आणि टांकसाळीचे नाव मुर्तजाबाद (मिरज) असे अंकित आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकुर यांनी दिली. ठाकूर यांच्या संग्रही हे नाणं आहे.