• Thu. Mar 12th, 2026

    मराठवाडा मुक्ती संग्राम विशेष: कल्हाळी गावातील गढीवर फडकावला होता तिरंगा, ३ दिवस रझाकारांशी कडवी झुंज

    मराठवाडा मुक्ती संग्राम विशेष:  कल्हाळी गावातील गढीवर फडकावला होता तिरंगा, ३ दिवस रझाकारांशी कडवी झुंज

    नांदेड: मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. याच अनुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मराठवाडा निझाम राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अनेकांनी कडवी झुंज देत प्राणांची आहुती दिली. यात नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे कल्हाळीच्या शौर्यगाथेचा आवर्जून उल्लेख करण्यात येतो. नाईकांच्या गढीवर तिरंगा फडकावण्यावरून रझाकारांनी तीन दिवस बेछूट गोळीबार केला होता. कल्हाळीच्या ग्रामस्थांनी याचा प्रतिकार केला आणि नाईकांचा वाडा पेटवून देण्याचा रझाकारांचा मनसुबा हाणून पाडला. यात ३५ जणांना हौतात्म्य देखील आले होते.

    नांदेड जिल्ह्यात मन्याड खोऱ्याच्या दक्षिणेस डोंगरभागात मौजे कल्हाळी (ता. कंधार) हे गाव आहे. त्या वेळी या ठिकाणी नाईकांची जहागिरी होती. नाईक घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटवडा (काशीद) गावचे. या घराण्याचे प्रमुख दत्ताजीराव गायकवाड, त्यांचे दोन पुत्र मानसिंहराव आण लक्ष्माजीराव यांनी मराठवाड्यातील पेठवडज- कल्हाळी येथील जहागिरी मिळवली. बापूसाहेब भगवंतराव नाईक व अप्पासाहेब नाईक हे सातव्या पिढीतीलवंशज होते. हे दोघेही हैदराबाद संस्थान निजामाच्या जोखडातून मुक्त व्हावे या मताचे. अप्पासाहेब व माधवराव मरेवाड यांनी शत्रूशी मुकाबला कसा करावा याचे प्रशिक्षण सहकाऱ्यांना दिले. निजामाच्या पोलिसांची या सर्वांवर वक्रदृष्टी होती. तशातच त्यांनी एके दिवशी आपल्या वाड्याच्या गढीवर तिरंगा ध्वज फडकावला. ही बातमी मुखेडच्या फौजदाराला समजताच तो कल्हाळीला धावून आला. पोलिसांनी गढीवर गोळीबार केला.

    मराठवाड्यात शेतकऱ्याचं नुकसान, सरकारी कार्यक्रमाच्या खर्चावर छत्रपती संभाजीनगरकर काय म्हणाले?

    नाईकांच्या वाड्याला गराडा; रझाकारांशी रात्रभर गोळीबार

    २८ जून १९४७ रोजी मिलिटरीचे ५०० जवान व १५०० रझाकारांनी कल्हाळीच्या दिशेने आगेकूच केली. २३ जून १९४७ ला पहाटे ५ वाजता नाईकांच्या वाड्याला गराडा घालण्यात आला. गढीत नाईकांनी आपल्या ८० साथीदारांसह आश्रय घेतला. गढीवरून लक्ष्मण बाबाराव वडजे व संभाजीराव टोळ यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू झाला. अनेक रझाकार ठार झाले. पिसाळलेल्या रझाकारांनी घरे पेटवली. २९ जून ते १ जुलै १९४७ पर्यंतहा रझाकारांशी मुकाबला चालू होता. रात्रभर गोळीबार होत होता. कोणीही मागे हटत नव्हते. ७ जुलै १९४७ रोजी मंगळवारी सकाळी १० वाजता मिलिटरी व रझाकार यांनी गढीत प्रवेश मिळवला. समोरासमोरच्या लढाईत ३५ जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. अप्पासाहेब नाईकांना वीरमरण प्राप्त झाले, अशी माहिती सरपंच प्रतिनिधी गणपथ तोटवाड यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed