अशातच आता दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनीचा ताबा ज्या स्क्वेअर पोर्ट कंपनीने घेतल्यावर आमची वेतन थकबाकी शंभर टक्के द्या, या मागणीसाठी निलेश राणे यांच्या कामगार युनियनने उठाव केला आहे. मात्र यावेळी स्थानिक आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांचे मात्र आमदारांनी काढलेला तोडगा आम्हाला मान्य आहे, अशी भूमिका घेतली आहे. भारती शिपयार्ड बंद केल्यानंतर जवळपास सुमारे तीनशे ते चारशे कामगार तसेच अनेक ठेकेदार यांची देणी अद्याप बाकी आहेत. गेली काही वर्षे या कामगारांच्या कुटुंबियांसमोर संसार चालवायचे कसे हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे आता पालकमंत्री तथा उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंत यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात चाललेय तरी काय? असा प्रश्न कामगारांकडून विचारला जात आहे.
माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कामगार युनियनचे श्याम दाभोळकर, विनोद आरेकर, प्रविण कांबळे, जी.सी. नरोना, राहुल डिसोझा यांनी नवीन कंपनीकडून आम्हाला थकलेले वेतन आणि रोजगार मिळावा, अशी महत्त्वाची मागणी केली आहे. स्थानिक आमदार योगेश कदम यांनी नवीन ताबा घेतलेल्या कंपनी प्रशासनाला येथील भंगाराला कामगारांची शंभर टक्के देणी दिल्याशिवाय हातही लावू देणार नाही, अशी भूमिका काही दिवसांपूर्वी आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत मांडली होती. पण आता स्क्वेअर पोर्ट या कंपनीच्या प्रशासनाकडून कंपनीची चाळीस टक्के वेतन थकबाकी देण्याचे अलीकडे झालेल्या बैठकीत मान्य केल्याचा आरोप राणे यांच्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या कामगारांनी केला आहे.
कंपनी गेट समोर सुमारे दोनशे कामगारांनी एकत्र येत आम्हाला आमची शंभर टक्के वेतन थकबाकी त्याशिवाय आम्ही हातही लावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. भाजपाचे युवा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या कामगार युनियनने येथील जुन्या कामगारांना बळ देत शंभर टक्के वेतन थकबाकी दिल्याशिवाय नवीन कंपनीला येथे हातही लावून देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. दरम्यान आमदार योगेश कदम यांचे सार्थक उसगाव उपसरपंच चेतन रामाणे यांनी सांगितले की आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सगळ्या बाबत निवेदन दिले. त्यानंतर तात्काळ उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून हा विषय स्थानिक आमदार योगेश कदम यांच्याकडे दिला. आमच्या दोन-तीन बैठका झाल्या. त्यानंतर नवीन स्क्वेअर पोर्ट ही कंपनी कामगारांची थकीत वेतन बैठकीदारांचे पैसे काही प्रमाणात देण्यास तयार आहे. ते आम्हाला मान्य आहे कामगार युनियनचे नेते माजी खासदार निलेश राणे हेही आमच्या महायुतीचे नेते आहेत. त्यांचे आम्हाला आमदारांना आणि सगळ्यांना उत्तम सहकार्य आहे. या नित्य मंडळींचे एकमेकांसोबत बोलणंही सुरू आहे. मात्र स्थानिक पातळीवरती वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
स्थानिक आमदार योगेश कदम यांनी अलीकडे झालेल्या बैठकीत 40% कामगार आणि 50 टक्के ठेकेदार अशा स्वरूपाचा तोडगा काढला. तो आम्हाला कामगारांना मान्य नाही, अशी भूमिका राणे यांच्या महाराष्ट्र समर्थ कामगार युनियनचे श्याम दाभोळकर व कामगारांनी घेतली आहे. दरम्यान भाजपाचे जिल्हा नेते उदय जावकर यांनीही कामगार युनियनच्या कामगारांच्या नवीन कंपनीकडे ज्या मागण्या आहेत त्यासाठी भाजपची कामगारांच्या बाजूची भूमिका असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
त्यामुळे आता या कामगारांमधील या सगळ्या वादावर स्क्वेअर पोर्ट कंपनी संचालक गोयल यांच्याजवळ महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या प्रतिनिधीने मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी आपण बैठकीत असल्याचे सांगत थोड्या वेळाने प्रतिक्रिया देतो, असे सांगितले. मात्र पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.