• Tue. Jun 16th, 2026

    आम्ही उद्धव ठाकरे यांना मु्ख्यमंत्रिपद मागायला गेलो तेव्हा… प्रफुल पटेलांचा नवा गौप्यस्फोट

    आम्ही उद्धव ठाकरे यांना मु्ख्यमंत्रिपद मागायला गेलो तेव्हा… प्रफुल पटेलांचा नवा गौप्यस्फोट

    नागपूर : ‘ज्या अडीच वर्षांसाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) भाजपशी काडीमोड घेतला, तीच मागणी आम्ही केली असता उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेते मौन होते’, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.

    राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) पहिलाच संकल्प मेळावा शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. याद्वारे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सत्तेत सहभागी होण्याची भूमिका मांडली. ४३ आमदारांचे लाभलेले बळ, पक्षाची मान्यता व चिन्ह अबाधित राहील, अशी ग्वाही देत मनातील किंतू-परंतु दूर करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. सुमारे ४५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी आतापर्यंत पक्षाला कसे दुय्यम स्थान मिळत गेले, याचाही उल्लेख केला.

    हॉटेलात काम, चळवळीसाठी जमीन विकली, आरक्षणासाठी ३० हून अधिक आंदोलने, मनोज जरांगे पाटील कोण?
    ‘शिवसेनेचे ५६ आणि आपले ५४ होते. याआधारे अडीच नाही तर किमान दोन वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद अपेक्षित होते. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो असता त्यावेळी तोंड उघडण्यास ते तयार नव्हते. त्यावेळी आदित्य ठाकरे व संजय राऊतदेखील उपस्थित होते. मात्र, कुणीही बोलले नाही. राष्ट्रवादीला अनेकवेळा संधी आली. मात्र, प्रत्येकवेळी आपण गमावली. काँग्रेसने सुरुवातीपासून झुकते माप घेतले व आपल्याला ठराविक झागा दिल्या. प्रत्येकवेळी आम्ही माघार घ्यायची का, पहिल्या क्रमांकावर येण्याची आशा बाळगायची नाही का’, असे सवाल करून ‘भाजपकडून पूर्ण न्याय मिळणार आहे. यापुढे आपला पक्ष अधिक बळकट करू’ असे पटेल यांनी सांगितले.

    ‘पक्षाचे नाव, चिन्ह मिळेल की नाही, याची चिंता करू नका. आपल्यासोबत ४३ आमदार आहेत. आणखी येतील. बहुसंख्य कार्यकर्ते सोबत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल. काटोल-नरखेडमधील इतरांना आधी जागा मिळायची का? पक्षाने अनेक नेत्यांना बळ दिले. पण, त्यांनी इतरांना संधी दिली नाही व दुसरी फळी तयार केली नाही, ही शोकांतिका आहे’, असे पटेल म्हणाले.

    लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून फोन गेला होता-तो फोन कुणाचा? संजय राऊत यांचा सवाल
    जागांच्या वाटाघाटीत निम्म्या जागांची मागणी करावी. अनेक जिल्ह्यांत पक्षाचे बळ आहे. त्यातून आपल्या जागा वाढतील, असे सांगून अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी घरोघरी राष्ट्रवादी अभियानातून पक्ष बळकट करण्याची ग्वाही देऊन शहरातील विविध प्रश्नांकडे पटेल यांचे लक्ष वेधले. जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी ग्रामीणमध्ये कार्यकर्त्यांवर कसा अन्याय होत गेला, याची माहिती दिली.

    महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिकर, सरचिटणीस ईश्वर बाळबुधे, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांचेही भाषण झाले. राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल खांडेकर व कार्याध्यक्ष रवी पराते यांच्यासह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. व्यासपीठावर सतीश शिंदे, सुनील फुंडे, अरविंद भाजीपाले आदी उपस्थित होते. यावेळी आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

    अकोल्यात ताकद असलेला नेता ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं, राष्ट्रवादीला धक्का
    लोगोवरून मतभेद, ऐक्य कसे होणार?

    ‘ज्यांच्यामध्ये साधा लोगो ठरविण्याबाबत एकमत होऊ शकत नाही, संयोजक ठरवता येत नाही, १३ जणांची समिती करावी लागते, शक्य असेल तिथे एकच उमेदवार उभा करू, अशी शक्य-अशक्यची भाषा बोलावी लागते त्या ‘इंडिया’मध्ये ऐक्य कसे होणार, ते एकत्र कसे लढणार’, असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी चढवला.

    नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या मीट द प्रेस कार्यक्रमात बोलताना महायुतीत सहभागी होण्यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. संसदेच्या विशेष अधिवेशनाची विषयपत्रिका अद्याप आलेली नाही. नेमकी कशावर चर्चा होईल, हे पत्रिका आल्यावरच कळेल. पाच दिवस अधिवेशन चालणार असल्याने विरोधी पक्षाने आता चर्चा करावी, असा टोलाही प्रफुल्ल पटेल यांनी लगावला. शरद पवार आमचे दैवत आहे. त्यांच्यावर आम्ही बोलणार नाही, हे आधीच ठरवले आहे, असे सांगून प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्नांना बगल दिली.

    राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच | प्रफुल पटेल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed