• Sat. Sep 21st, 2024
‘मिठी’ नदीचा प्रवास पूरमुक्तीकडे, महापालिकेचा मोठा निर्णय; दोन वर्षांत काम पूर्ण होणार

मुंबई : पावसाळ्यात विहार तलाव ओसंडून वाहू लागल्यास ते पाणी मिठी नदीत सोडले जाते. त्यामुळे पूर आणि त्यात विहार तलावातून सोडलेले जादा पाणी, यांमुळे पावसाळ्यात मिठीला पूर येण्याची सतत भीती असते. पूर आल्यास त्याचा फटका आजूबाजूच्या परिसराला बसतो. मिठी पूरमुक्त करण्यासाठी पावसाळ्यात विहार तलावातील अतिरिक्त पाणी भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात वळवण्याच्या मुंबई महापालिकेच्या योजनेला गती दिली जात आहे. या कामासाठीची निविदाप्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दोन वर्षांत काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती पालिकेने शनिवारी दिली.

पालिकेतर्फे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचा पाहणीदौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पिसे पांजरापूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; महाराष्ट्र बंदची हाक, सोमवारी नाशिक बंद
विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा आणि भातसा या जलस्रोतांतून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. हे स्रोत शहरापासून सुमारे १०० किलोमीटर व त्यापेक्षाही जास्त अंतरावर आहेत. मुंबईच्या हद्दीत केवळ विहार आणि तुळशी तलाव आहे. विहार तलावाची पाणीसाठवण क्षमता २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे पावसाळ्यात तो लगेचच भरतो. त्यानंतर त्याचे जादा पाणी मिठी नदीत सोडले जाते. त्यामुळे मिठीच्या पाण्याची पातळी वाढते. परिणामी, काही वेळा पुरसदृश परिस्थिती होऊन कुर्ला, सायन, माहीम, माटुंगा, चुनाभट्टी, वाकोला या भागांना त्याचा फटका बसतो. हे टाळण्यासाठी या जादा पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी विहार तलावाच्या किनाऱ्यावर २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचे पंपिंग स्टेशन बांधण्याचा विचार आहे. या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी २०२०मध्ये सल्लागार नियुक्त करण्यात आला होता. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. २०४१पर्यंत अंदाजित लोकसंख्या एक कोटी ७२ लाख, तर पाण्याची मागणी प्रतिदिन सहा हजार ५३५ दशलक्ष लिटर इतकी असेल. भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी गारगाई (४४० दशलक्ष लिटर प्रतिदिन), पिंजाळ (८६५ दशलक्ष लिटर प्रतिदिन) व दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प (१,५८६ दशलक्ष लिटर प्रतिदिन) हे स्रोत विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. गारगाई धरणासाठी वन मंत्रालय आणि वन्यजीव महामंडळाकडून मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठ्यात प्रतिदिन दोन हजार ८९१ दशलक्ष लिटर इतकी वाढ होणे अपेक्षित आहे.

याशिवाय मनोरी येथे ४०० दशलक्ष लिटर प्रतिदिनपर्यंत विस्तार क्षमता असलेल्या २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल व मसुदा निविदा तयार करण्यासाठी सल्लागाराची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यास लवकरच अंतिम स्वरूप देऊन प्रकल्प विकसित करण्याच्या कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.

असे आहे नियोजन…

विहार तलावातील अतिरिक्त पाणी पंपिंग स्टेशनमध्ये वळवले जाईल, जे पुढे भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाईल. त्यानंतर शुद्ध केलेले पाणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध होऊन मुंबईकरांची पाण्याची गरज भागवण्यास मदत होईल.

या प्रकल्पाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या निविदा मूल्यांकनाचे काम सुरू आहे. साधारण दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. त्यानंतरच पाण्याचा योग्य वापर आणि मिठी नदी काही प्रमाणात पूरमुक्त होण्याचा दिलासा मिळेल.

– पुरुषोत्तम माळवदे, पालिकेच्या जलविभागाचे मुख्य अभियंता

मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचे मराठवाड्यात पडसाद; ठिकठिकाणी निषेध, आंदोलने आणि बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed