• Sat. Sep 21st, 2024

ट्रिपवरुन घरी परतले, हसतं खेळतं चौधरी कुटुंब साखरझोपेत असताना आगीच्या ज्वाळांनी वेढलं, अन्…

ट्रिपवरुन घरी परतले, हसतं खेळतं चौधरी कुटुंब साखरझोपेत असताना आगीच्या ज्वाळांनी वेढलं, अन्…

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथून काळजात धस्स करणारी बातमी समोर आली आहे. पूर्णा नगर येथे असलेल्या एका हार्डवेअरच्या दुकानात भीषण आग लागून राजस्थान येथील एका कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला. दोन तीन दिवस ते बाहेर फिरण्यासाठी गेले होते. रात्री ते तिकडून आले आणि झोपले. मात्र आज पहाटेच्या सुमारास आग लागली आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. राजस्थान येथील पाली जिल्ह्यात राहणारे हे कुटुंब होते. रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चिमणाराम बेणाराम चौधरी (वय 48), नम्रता चिमणाराम चौधरी(वय 40), भावेश चिमणाराम चौधरी (वय 15), सचिन चिमणाराम चौधरी (वय 13) अशी होरपळून मृत्यू झालेल्या चार जणांची नावे आहेत. अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.

Pune Fire: पिंपरीत हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चिमणाराम चौधरी आणि त्यांचे कुटुंब हे राजस्थानवरून पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात असणाऱ्या पूर्णानगर भागात राहायला आले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी या ठिकाणी स्वतःचे हार्ड वेअरचे दुकान सुरू केले होते. त्या दुकानातच मागचा भागात ते कुटुंबासमवेत रहात होते. या दुकानात इलेक्ट्रिकचे साहित्य मोठ्या प्रमाणात होते. दोन तीन दिवस ते फिरण्यासाठी बाहेर गेलेले. ते मंगळवारी रात्रीच परतले होते. रात्री जेवण झाल्यानंतर पती-पत्नी आणि दोन मुलं झोपी गेली होती. मात्र आज बुधवारी पहाटेच्या सुमारास शेजाऱ्यांना समजले की, या दुकानात अचानक आग लागली. त्यावेळी कुटुंब गाढ झोपेत होते. आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यांना कुठलीही हालचाल करण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

आगीचे लोट बाहेर पडत असताना शेजारी असणाऱ्या नागरिकांना दिसले. त्यानंतर अग्निशामक दलाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत चारही मृतदेह दुकानातून बाहेर काढले आहेत. राजस्थानवरून पोट भरण्यासाठी आलेल्या चौधरी कुटुंबाचा असा दुर्देवी अंत होईल, असे कुणाच्या मनातही नसेल. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव होता. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed