• Mon. Sep 7th, 2026
मराठा आरक्षणासाठी जनआक्रोश आंदोलन,मंत्री आले नसल्याने आंदोलन चिघळले; आमरण उपोषण सुरू

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शहागड येथील पैठण फाट्यावर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीही मंत्री उपस्थित नसल्याने आंदोलकांनी निवेदन न देता आंतरवाली येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

मराठा समाज ‘कुणबी’ असल्याचे हैदराबाद संस्थानाच्या दस्तावेजावरुन सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी प्रमाणपत्र’ द्यावे, या प्रमुख मागणीसाठी शहागड (ता. अंबड) येथे मंगळवारी मराठा जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. गोदाकाठ परिसरातील १२३ गावातील हजारो नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. मुख्य समन्वयक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण ओबीसी प्रवर्गातून द्यावे, मराठा समाजाला लागू असलेले पूर्वीचे आरक्षण पूर्ववत लागू करावे, महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करुन अधिकचे आरक्षण रद्द करावे, कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी देण्यासाठी खटला तात्काळ सुरू करावा आदी मागण्या आहेत. राज्य सरकारमधील कोणत्याही तीन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आंदोलकांचे निवेदन स्वीकारावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, कुणीही आले नसल्याने आंदोलकांनी निवेदन दिले नाही. तसेच राज्य शासनाचा निषेध करीत व्यापक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

आंतरवालीत उपोषण सुरू

सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या आंदोलनाची दुपारी अडीच वाजता सांगता करण्यात आली. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. आरक्षणाबाबत ठोस घोषणा करण्यावर आंदोलक ठाम होते. शिवाय, शासनाच्या वतीने कुणीही मंत्री उपस्थित नसल्यामुळे आंदोलकांनी आंतरवाली येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed