• Sat. Sep 21st, 2024
मुंबई पुणे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा, सुट्ट्यांमुळं पर्यटकांची गर्दी, पाहा फोटो

पुण्यातील पर्यटनस्थळी मोठी गर्दी

पुण्यातील पर्यटनस्थळी मोठी गर्दी

दिवसेंदिवस पर्यटकांमध्ये पर्यटनाचे आकर्षण वाढले आहे. मुंबई, ठाणे व पुण्यातील पर्यटकांसह महाराष्ट्र आणि देश विदेशातील पर्यटक लोणावळा, खंडाळा आणि मावळातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी देतात. मात्र यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला व त्यानंतर सलग सुट्ट्यांचा योग जुळून आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांसह अनेकांनी या सलग सुट्टयांचे योग साधत कुटुंब व मित्रांसमवेत पावसाळी पर्यटन स्थळांना पसंती देत, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुरुड, अलिबाग, कोल्हापूर, महाबळेश्वर, पाचगणी, कोकणसह राज्यातील विविध प्रसिध्द पर्यटन स्थळांकडे मोर्चा वळविला.

लोणावळ्यात मोठी गर्दी

लोणावळ्यात मोठी गर्दी

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळयातील भुशीडॅमच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी पर्यटकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. भुशी डॅमसह लोणावळ्यातील टायगर, लायन्स, शिवलिंग, राजमाची पॉईंट्ससह गिधाड तलाव, घुबड धबधबा, तसेच कार्ला, भाजे, बेडसे लेणी, व पवनाधरण, तुंगार्ली, लोणावळा, वलवन, शिरोता आणि उकसान या धरण परिसरासह लोहगड, विसापूर, कोराईगड, राजमाची, तुंग, तिकोना या गड किल्ल्यांसह आंदर व नाणे मावळातील पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेली होती.

मोठ्या संख्येनं पर्यटक, वाहनांच्या रांगा

मोठ्या संख्येनं पर्यटक, वाहनांच्या रांगा

मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडल्याने त्यांच्या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेसह जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच लोणावळ्यातील भुशीधरण व टायगर पॉईंट्सकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना तांसतास ताटकळत वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाला पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानं पोलिसांसह प्रशासनाला देखील सतर्क राहावं लागतं.

पाऊस नसला तरी आनंद लुटला

पाऊस नसला तरी आनंद लुटला

पावसाने मागील काही दिवसांपासून उघडीप दिल्यामुळे लोणावळ्यासह मावळातील धबधब्यांचे पाणी ओसरल्याने तर भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी कमी वाहत असतानाही पर्यटकांनी यागोष्टींचा विचार न करता पर्यटनाचा आनंद लुटला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भुशी धरणाकडे पायी जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय होती. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी तर लोणावळ्या पासून भुशी धरणापर्यंत पायी चालत रस्त्याने जाणाऱ्या पर्यटकांना सूचना दिल्याचं पाहायला मिळालं.

पोलिसांचं उत्तम नियोजन अनर्थ टळला

पोलिसांचं उत्तम नियोजन अनर्थ टळला

सत्यसाई कार्तिक त्यानंतर ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भेटी घेत आढावा घेत होते. तर लोणावळा शहर पोलीस निरिक्षक सीताराम डुबल हे सहारा पुलावरील चौकीत ठाण मांडून येथील वाहतूक कोंडी व गर्दीवर नियंत्रण ठेवत होते. लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांच्या उत्तम नियोजनामुळे यावर्षी पावसाळी बंदोबस्त व कायदा व सुव्यस्था उत्तमरीत्या अबाधित राहिली. मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होऊनही कोणताही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed