पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह केलेल्या बंडाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडली. पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर जाहीर व्यासपीठावरून टीकाही केली. स्वत: अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र एकीकडे पवार यांच्या इच्छेविरुद्ध राज्य सरकारमध्ये सामील होत असताना अजित पवारांसह त्यांचे समर्थक आमदार यांच्याकडून शरद पवार हेच आजही आमचं दैवत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे शरद पवार यांच्या संमतीनेच या घडामोडी झाल्या आहेत का, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. अशातच अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात केलेल्या एका नव्या वक्तव्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
शिरूरचे माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांच्या स्मारकाच्या उद्घटनासाठी अजित पवार तालुक्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत टोलेबाजी केली. ‘शिरूर तालुक्यात अगदी सुरुवातीच्या काळात पोपटराव हे साहेबांचे उमेदवार आणि बाबुराव हे माझे आमदार, असा प्रचार झाला होता. मात्र मी त्यावेळी म्हटलं होतं की साहेब आणि मी काही वेगळे आहोत का? आम्ही तेव्हाही वेगळे नव्हतो आणि आजही वेगळे नव्हतो, काळजी करू नका,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शिरूरचे माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांच्या स्मारकाच्या उद्घटनासाठी अजित पवार तालुक्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत टोलेबाजी केली. ‘शिरूर तालुक्यात अगदी सुरुवातीच्या काळात पोपटराव हे साहेबांचे उमेदवार आणि बाबुराव हे माझे आमदार, असा प्रचार झाला होता. मात्र मी त्यावेळी म्हटलं होतं की साहेब आणि मी काही वेगळे आहोत का? आम्ही तेव्हाही वेगळे नव्हतो आणि आजही वेगळे नव्हतो, काळजी करू नका,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
‘तुम्ही सकाळी ७ वाजताच कार्यक्रमाला जाता, पण इतक्या लवकर लोकं कशी येतात? असा प्रश्न मला अनेकजण विचारतात. पण आपण लोकांना कशा सवयी लावतो, त्यावर ते अवलंबून असतं. आपल्याला साहेबांनी सकाळपासून काम करण्याची सवय लावली,’ असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, एकीकडे काँग्रेससह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी केलेल्या विरोधानंतरही शरद पवार हे आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. त्यातच आता अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
