किशोर कदम यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करत सध्याच्या राजकीय स्थितीवरही परखड भाष्य केलं आहे. कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे. आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत. आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणवीसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. तसं नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे , मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी, अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भिडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, काल विधिमंडळात संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी झाल्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही मागणी होत असल्याने सरकार याबाबत कठोर निर्णय घेणार का, हे पाहावं लागेल.
भिंडेंच्या वक्तव्यावरून सभागृहातही वातावरण तापलं…
संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. त्यानंतर भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाची पडताळणी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. तत्पूर्वी, भिडे यांच्या विधानाची योग्य दखल घेऊन सरकारने कारवाई करावी, असा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
‘अमरावती येथे संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने राष्ट्रपित्याबद्दल निंदा-नालस्ती करणारे वक्तव्य केले आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३ अनुसार तातडीने अटक केली पाहिजे,’ अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ‘या व्यक्तीकडून समाजात तणाव निर्माण करण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. राष्ट्रपित्याबद्दल इतके निंदाजनक वक्तव्य या व्यक्तीने केले असल्यास ती बाहेर कशी फिरू शकते, यावर काही प्रतिक्रिया उमटली तर त्यास जबाबदार कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या व्यक्तीला तातडीने अटक करायला पाहिजे,’ अशी मागणी चव्हाण यांनी केली.
