कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी-पाटगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात तांबळे अनफ खुर्द येथे राहणारा २२ वर्षीय आदिल कासम शेख आणि जहीर जावेद शेख हे दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. तर, साहिल मुबारक शेख हा तरुण जखमी झाला आहे. आज दुपारी हे तिघेजण आपल्या चार चाकीतून अनफ खुर्द इथून अनफ बुद्रुकच्या दिशेने निघाले होते. मात्र, पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात आदिल शेख याचा चारचाकीवरील ताबा सुटल्याने कारने पलटी मारत दासेवाडी येथील एका पुलावरून ओढ्यात कोसळली.
या गाडीतून प्रवास करणारे तिघांपैकी दोघेजण जागीच ठार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गाडीतील जखमींना बाहेर काढण्यास काढले. जखमींना गारगोटीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच आदिल आणि जहीर यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर अनप खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात ठार झालेल्या आदिल याने खानापूर येथील महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले होते. तर, जहीर हा गारगोटी येथे नोकरी करत होता.
अपघातात ठार झालेल्या आदिल हा आज कोल्हापुरात आपली नवी कार नेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह येणार होता. आदिलचा मित्र आरमान सय्यद याला अपघाता आधी पाच मिनिटे वेसरडे येथे फोन करून याबाबत त्याने सांगितले होते. नवीन कार घरात येणार असल्याने घरातील सर्वच सदस्य आनंदित होते. मात्र, त्यांचा हा आनंद काही काळाचाच ठरला. अपघातात तरुण मुलाचा मृत्यू ओढवल्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जहीरच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तर, आदिलच्या घरी आई-वडील तीन बहिणी असा परिवार आहे.