काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून अलमट्टी धरणातील पाणी पातळी ८२.५० टीएमसी म्हणजेच ५१६.६४ मीटर असल्याची माहिती दिली. अलमट्टी धरणात सध्या १ लाख ४१ हजार ६७२ क्युसेक पाणी येत असून ३० हजार क्युसेकचा विसर्ग केला जात आहे, असं सतेज पाटील म्हणाले. दुसरीकडे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून याशिवाय राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले असून ७ हजार ११२ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे.
महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारच्या १९ जून २०२१ च्या समन्वय समितीच्या बैठकीच्या निर्णयानुसार १५ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटर पाणी पातळी अलमट्टी धरणात राखणं आवश्यक आहे, असं सतेज पाटील म्हणाले. सतेज पाटील यांनी कोल्हापूर आणि सागंलीतील स्थिती लक्षात घेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा, असं म्हटलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यावर सध्या महापुराचे संकट वाढवत आहेत. पंचगंगा सध्या धोका पातळीकडे वाटचाल करत असून अशातच राधानगरी धरण देखील १०० टक्के भरल्याने त्याचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये सुरू असल्याने उद्या पंचगंगा आपली धोका पातळी गाठेल. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पत्र लिहीत अलमट्टीधरणा मधून अधिकचा विसर्ग सुरू करण्याचे विनंती केली आहे.
Requesting attention of @siddaramaiah ji and @DKShivakumar ji. Your swift action is needed to resolve this issue and ensure the well-being of Maharashtra’s flood-affected people. pic.twitter.com/gp67sQbBX8
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) July 26, 2023
सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न मांडला
कोल्हापूर आणि सांगली येथील पूरपरिस्थिती संदर्भात सतेज पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी यापूर्वी दरवर्षी दोन्ही राज्यांची मंत्री समितीची बैठक घेण्यात येत होती. यावर्षी अद्याप बैठक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे त्वरित दोन्ही राज्यातील मंत्री समितीची बैठक घेण्यात यावी, तसेच अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्याची सूचना करण्यात यावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.
यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत माननीय उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस आज सभागृहात निवेदन करतील असे सांगितले.
दरम्यान, राधानगरी धरण आज १०० टक्के भरलं आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीकडे जाऊन पूरस्थिती निर्माण होण्यापासून रोखणं गरजेचं असेल तर अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची आवश्यकता आहे.