• Sat. Sep 21st, 2024

रायगड दुर्घटनेतून धडा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

रायगड दुर्घटनेतून धडा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली. ‘रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत शुक्रवारी मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी धोकादायक दरडप्रवण क्षेत्रांतील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे’, असे सांगतानाच, ‘इर्शाळवाडीतील रहिवाशांचे सिडकोच्या माध्यमातून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे’, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली. दुर्घटनास्थळी अजूनही मदतकार्य सुरू आहे. गुरुवारी दिवसभर इर्शाळवाडी येथे तळ ठोकून बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानभवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी विधानसभेत निवेदन केले. शिंदे यांनी इर्शाळवाडीतील अनुभव कथन करताना त्या भागातील परिस्थिती किती बिकट आणि धोकादायक होती, याची माहिती दिली. ‘दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व बचाव पथकांना तत्काळ पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, उदय सामंत हे रात्रीच दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. मंत्री अदिती तटकरे, अनिल पाटील, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी इर्शाळवाडीकडे धाव घेतली. यंत्रणांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मी पायी चालत डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला. तेथील दृश्य विदारक होते’, असे मुख्यमंत्री शिंदे सांगितले.

Weather Forecast : राज्यात पुढील २ दिवस पाऊस धुमाकूळ घालणार; कोणत्या भागात किती कोसळणार? असा आहे हवामानाचा अंदाज

‘एवढ्या उंचावर साहित्य, साधनसामुग्री घेऊन जाणाऱ्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना सलाम करतो’, असे सांगत शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीर उभे आहे’, अशी ग्वाही दिली. त्याचवेळी ‘यंत्रणा, साधने असूनही प्रतिकूल परिस्थितीमुळे तिचा वापर करू शकलो नाही’, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ‘स्थानिक माहितीनुसार या आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंबे वास्तव्यास असून, गावाची लोकसंख्या २२८ आहे. त्यातील सुमारे १७ ते १८ घरांवर दरड कोसळली. बचावकार्यात ९८ व्यक्तींना सुरक्षित वाचविण्यास यश आले. २२८पैकी उर्वरीत १०९ व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही’, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले

Raigad landslide: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, आकडा २२ वर; अजूनही तब्बल १०९ जणांचा शोध सुरूच!

असे आहे बचाव पथक

‘बचावकार्यात यशवंती हाइकर्स स्वयंसेवी संस्थेचे २५ स्वयंसेवक, चौकचे ३० ग्रामस्थ, वरोसेतील २० ग्रामस्थ, खोपोली नगरपालिकेचे २५ कर्मचारी, चौक ग्राम पंचायतीचे १५ कर्मचारी, निसर्ग ग्रुप-पनवेल यांचे १५ स्वयंसेवक तसेच कोलाड रिव्हर राफ्टर्स आदींचा सहभाग आहे. तसेच एनडीआरएफच्या चार पथकांतील १०० जवान व टीडीआरएफचे ८० जवान, स्थानिक बचाव यंत्रणेची पाच पथके या बचावकार्याच्या कामात मोलाची कामगिरी बजावित आहेत’, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके

‘इर्शाळगडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकेसह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा आणि इतर साहित्य तत्काळ उपलब्ध करण्यात आले. बचाव करण्यात आलेल्या नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आवश्यक सोयी-सुविधायुक्त कंटेनर, इतर मुलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शोध आणि बचावकार्यासाठी आवश्यक साहित्य तातडीने डोंगराच्या पायथ्याशी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed