मान्सून उशिरा दाखल झाल्यानं आणि रखडल्यानं नीरा नदी पात्र कोरडं पडलेलं होतं. त्यामुळं वारकऱ्यांच्या नीरा स्नानाच्या आनंदावर यंदा विरजण पडलं. मात्र वारकऱ्यांनी पाऊस येऊ दे असं विठुरायाकडे साकडं घातलं आहे. सराटी गावाजवळ तुकोबांच्या पादूकांना नीरा स्नान घातलं जातं. यंदा तुकोबांच्या पादुकांना टँकरनं स्नान घालण्याची वेळ आली. नीरास्नान झाल्यानंतर आता पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. सदाशिवनगर येथे अश्वाचे गोल रिंगण पार पडणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने इंदापूर शहरातील मुक्काम आटोपून सराटी गावाकडे शुक्रवारी प्रस्थान ठेवले. तालुक्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या सराटी गावात पालखीने सायंकाळी सात वाजता प्रवेश केला होता. या ठिकाणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. आज,पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे.
इंदापूर येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा काल दुपारच्या मुक्कामासाठी बावड्याकडे निघाला. या वेळी इंदापूर शहरवासीयांनी पालखीला भावपूर्ण निरोप दिला. इंदापूर येथून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पालखी सोहळ्यासोबत पायी चालत बावड्यापर्यंत सहभागी झाले. पालखी सोहळा विठ्ठलवाडी, वडापुरी, रामवाडी, शेटफळ पाटी, सुरवड, वकिलवस्ती मार्गे बावडा येथे दुपारच्या मुक्कामासाठी दाखल झाला. प्रवासादरम्यान गावोगावच्या लोकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बावडा येथे सरपंच किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे; तसेच प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मनोज पाटील, महादेव घाडगे आदींनी स्वागत केले. त्यानंतर बावडा ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन बाजारपेठेतून बाजारतळावर उभारण्यात आलेल्या शामियान्यात आणली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी इंदापुरात वारीमध्ये सपत्नीक सहभागी झाले.
टाळ मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत दुपारी तीनच्या सुमारास पालखी सोहळा बावडा या ठिकाणी दाखल झाला. या वेळी तोफांच्या आतषबाजीत व भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. या वेळी हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी हजारो वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. पालखी सराटी गावात दाखल झाली त्या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व ग्रामस्थांनी स्वागत केले.