• Sat. Sep 21st, 2024

NCP NEWS : अजितदादांकडून पदाची मागणी, छगन भुजबळांनी ओबीसीच्या मुद्द्याचं हत्यार उपसलं

NCP NEWS : अजितदादांकडून पदाची मागणी, छगन भुजबळांनी ओबीसीच्या मुद्द्याचं हत्यार उपसलं

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाभरणी करताना शरद पवारांनी काँग्रेसमधील अनेक मातब्बर मराठा नेत्यांना साथीला घेतलं. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील.. अशा मुरब्बी नेत्यांसोबतच तरूण नेत्यांचीही पवारांना साथ लाभली. जयंत पाटील, आर.आर.पाटील, दिलीप वळसे पाटील ते राजेश टोपे..शरद पवारांनी यांसारख्या उमद्या मराठा नेत्यांना ताकद दिली.. पवारांनी घडवलेल्या मराठी नेत्यांची यादी तशी मोठीच आहे. म्हणूनच पवारांवर मराठा वर्चस्वाचं राजकारणाचा आरोप केला जातो. मात्र सत्तेच्या आणि संघटनेच्या पदांवर इतर घटकांची वर्णी लावून पवारांनी प्रतिकात्मक राजकारण घडवून आणलं आणि समतोल राखण्याचा प्रयत्न केला. आणि आता याच प्रतिकात्मक मुद्द्याचं हत्यार छगन भुजबळांनी उपसलंय.
अजित पवारांचा प्रदेशाध्यक्षपदावर दावा? NCPच्या कार्यक्रमात दादांनी केलं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांकडून संघटनात्मक जबाबदारीची मागणी करण्यात आली. पण बहुतांश काळ सत्तेच्या पदांवर असलेल्या अजित दादांच्या या मागणीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अजितदादांनी संघटनात्मक पदाची मागणी करताच छगन भुजबळांनी ओबीसी प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. अजितदादांनी थेट प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केला नसला तरी त्यांचा रोख सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पण राष्ट्रवादीत जातीय समतोल साधण्यासाठी अनेकदा पदांची फेरबदल झाल्याचं विसरून चालणार नाही.

> राष्ट्रवादीतील सत्तेच्या, संघटनेच्या पदांवरील नियुक्त्यांना जातीय समीकरणांचा इतिहास
> राष्ट्रावादी स्थापनेवेळी पवारांकडून मराठा समाजाच्या नेत्यांना स्थान
> ओबीसी नेते छगन भुजबळांना पहिले प्रदेशाध्यक्ष करून समतोल
> १९९९ ला राज्यात आघाडी सरकार, काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी मराठा चेहरा, राष्ट्रवादीकडून भुजबळांना उपमुख्यमंत्री करून समतोल
> २००४ ला काँग्रेसकडून विलासरावांनंतर सुशिलकुमार शिंदेंच्या रूपाने दलित मुख्यमंत्री, त्यानंतर शरद पवारांकडून विजयसिंह मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्रीपदी संधी

प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ मोजला, जयंत पाटलांनी अजित दादांना टोला देत कार्यकर्त्यांना संदेश दिला

आता अजितदादांनी संघटनात्मक पदाची मागणी केल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता असतानाच छगन भुजबळांनी ओबीसीचा मुद्दा तापवलाय. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसनं भुजबळांना तर प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी दिली. शिवाय २०१५ ते २०१८ मध्ये सुनील तटकरे यांनीही प्रदेशाध्यक्ष पद भूषवलं. आता पुन्हा ओबीसी प्रदेशाध्यक्ष करण्याच्या भुजबळांच्या मागणीमुळे कार्यकाळ पूर्ण झालेल्या जयंत पाटलांची अधिकची संधी हातून जाऊ शकते. आणि ओबीसी प्रदेशाध्यक्ष करायचाच झाल्यास अजितदादांचंही नुकसान अटळ आहे.

एकंदरीतच छगन भुजबळ यांची मागणी अजितदादांची अडचण वाढवणारी आहे. अजितदादांच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्यासाठी भुजबळांनी गुगली टाकली नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed