• Sun. Mar 8th, 2026
    सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री; पवार-ठाकरेंचा फॉर्म्युला, भाजपचा दावा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘चालू पंचवार्षिकमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील. मात्र, २०२४मध्ये सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद, तर आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निश्चित केला होता. त्यासाठी जाणीवपूर्वक शिवसेनेचे कमी आमदार निवडून आणायचे, असेही ठरले होते. ही गोष्ट समोर आल्यामुळे शिवसेनेतील आमदारांनी उठाव केला,’ असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केला.

    ‘मोदी ९’ अभियानांतर्गत भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत आयोजित पक्षाच्या ‘टिफीन’ बैठकीनंतर बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

    बावनकुळे म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नव्हते. त्यांच्या खिशाला पेनही नसायचा. मात्र, अजित पवार उशिरापर्यंत मंत्रालयात थांबून काम करायचे. परिणामी, शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती. २०२४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शंभर आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे आपण निवडून कसे येणार, अशी भिती शिवसेना आमदारांना होती. त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले.’

    औरंगजेबाच्या कबरीपाशी जाऊन प्रकाश आंबेडकरांनी शिवभक्तांचा अपमान केलाय, त्यांना अटक करा: आनंद दवे

    शिवसेनेच्या आमदारांसाठी जास्त काम करू

    ‘भाजप आणि शिवसेना एक परिवार आहे. परिवारातील दोन भावांमध्ये मतभेद होत असतात. ते मतभेद दूर करण्यासाठी पक्षनेतृत्व सक्षम आहे. एखाद्या जाहिरातीमुळे भाजप -शिवसेना युती तुटणार नाही. ही युती ‘फेव्हिकॉल’ने जोडलेली आहे. राज्यात २०२४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार येईल. शिवसेनेचे आमदार निवडून येण्यासाठी भाजपच्या उमेदवारांपेक्षाही दहा टक्के अधिकचे काम आम्ही करू,’ असेही बावनकुळे म्हणाले.

    प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले, आताही उद्धव ठाकरे युती करणार का? : चंद्रशेखर बावनकुळे

    जुने संस्कार कळण्यासाठी टिफीन बैठक

    ‘उत्तमराव पाटील, ना. स. फरांदे, गोपीनाथ मुंडे या नेत्यांनी घरून जेवणाचे डबे आणून कार्यकर्त्यांसोबत खाल्ले. त्यातून त्यांनी भाजप पक्ष वाढवला. आजच्या आधुनिक काळात पक्षाचे जुने संस्कार नवीन पिढीच्या कार्यकर्त्यांना कळावेत, यासाठी ‘टिफीन’ बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे,’ अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शिवाजीनगर येथील बैठकीस प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    ‘देवेंद्रजींना समर्थन मिळवून द्यायचे’

    ‘आपण सर्व ‘इलेक्शन मोड’मध्ये आहोत. आपण गेली नऊ वर्षे जाहीरनाम्याप्रमाणे कामे केली. ती कामे जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. त्यासाठी आपण ‘घर चलो अभियान’ राबवायचे आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांत साठ हजार घरांत भेटी द्यायच्या आहेत. देशासाठी काम करायचे असेल, तर मोदीजींना समर्थन मिळवून द्यायचे आहे. देवेंद्र महाराष्ट्र बदलू शकतात, यासाठी आपल्याला काम करून त्यांना समर्थन मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी प्रवास आणि संवाद गरजेचा आहे,’ असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधोरेखित केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed