कळव्यातील मनीषा नगर जयभीम नगर येथे अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून कार्यक्रम ठेवण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होता. या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि खा. राजन विचारे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे येणार असल्याचे भासून पोळ यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अशाप्रकारे फसवून पोळ यांना कार्यक्रमात बोलावलं असल्याचे महिला पदाधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी सर्व महापुरुष यांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला असे म्हणून स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर प्रथम शाई फेकली आणि नंतर मारहाण केली. यावेळी ठाकरे गटाच्या कोणताही पदाधिकारी या ठिकाणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोळ यांनी त्या ठिकाणावरून थेट पोलीस ठाणे गाठले.
कळवा पोलीस स्टेशन मध्ये अयोध्या पोळ यांनी तक्रार नोंदवली असून पोलीस स्टेशन बाहेर जमलेल्या शिंदे गटाच्या महिला तसेच पुरुष कार्यकर्त्याना पोलिसांनी पांगवले. दरम्यान हा कार्यक्रम ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून हा ट्रॅप रचण्यात आला असल्याचे स्थानिक ठाकरे गटातील महिला पदाधिकारी यांनी सांगितले.
शिवसैनिक अयोध्या पौळ या भगिनीला ठाणे-कळव्यात झालेली मारहाण अतिशय निंदनीय आहे. हा भेकडपणा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आलेख खाली आणणारा आहे. या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची हिंमत आता पोलिसांनी दाखवावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
