भोर तालुक्यातील ब्रिटिश कालीन धरण म्हणून भाटघर धरणाची ओळख आहे. या धरणातून सातत्याने विसर्ग कमी होत असल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. भाटघर धरणात गेलेले कांबरेश्वराचे मंदिर पाणी कमी झाल्याने बाहेर आले आहे. त्यामुळे हे मंदिर पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करू लागले आहेत. कांबरे हे गाव भोर शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. धरणाला पाणी असल्यावर जवळपास १० महिन्यांहून अधिक काळ हे मंदिर धरणाच्या पात्रात आहे.
हे मंदीर १० महिने पाण्यात असते. धरणातील पाणी कमी झाल्याने मंदीर पाण्याबाहेर आले आहे. मुख्यत: हे मंदिर भोर तालुक्यात असणाऱ्या वेळवंड नदीमध्ये वसलेले आहे. तसेच मंदिराचे मुळ नाव कर्मगरेश्वर आहे. परंतु हे मंदीर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे कांबरेश्वर नावाने या मंदिराची ओळख होऊ लागली आहे. पाण्यातील लाटांमुळे या मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र यंदाच्या वर्षी हे मंदिर बाहेर आल्याने पर्यटक या मंदिराकडे आकर्षित होत आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग, पार्वतीची मूर्ती आणि नंदी उभा आहे. पर्यटकांकडून या मंदिराला विशेष पसंती मिळत आहे.
