हे सर्व नागपुरातील चंदननगर येथील रहिवासी आहेत. नागपूर-नागभीड रस्त्यावरील कान्पा गावाजवळ काल दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघात इतका भीषण होता की, अक्षरश: गाडी कापून मृतांना बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व नागपुरातील रहिवासी एमएच ४९ बीआर २२४२ क्रमांकाच्या कारने नागपूरहून ब्रम्हपुरीकडे जात होते. कार कान्पा गावाजवळ येताच समोरून येणाऱ्या एआरबी नावाच्या खासगी बसला कारची जोरदार धडक बसली. या अपघातात कारचा चूराडा झाला. या अपघातात दोन पुरुष आणि दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात एक मुलगी आणि एक महिला गंभीर जखमी झाली. त्यांना नागभीड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. यामध्ये महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मुलीला पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आले. मात्र, वाटेतच मुलीचाही मृत्यू झाला.
नागपूरचं हे कुटुंब रुपेश विजय राऊत यांच्या वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी नागपूर येथील रोशन तागडे यांच्या गाडीतून भाऊ, आई आणि इतर नातेवाईकांसह ब्रम्हपुरी तालुक्यातील किन्ही गावी जात होते. त्याचवेळी ही खासगी बस नागभीडहून नागपूरकडे येत होती. दरम्यान, कान्पा गावाजवळ नागभीडकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार बसला धडकली.
ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भागाचा चुराडा झाला आणि चार जण जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी खासगी बस चालक राजेंद्र लकडू वैरकर याला ताब्यात घेतलं आहे.