• Sat. Sep 21st, 2024

उद्योगांसाठी अडथळे कायम; प्रशासकीय कूर्मगतीसह कुशल कामगारांचा तुटवडा, राज्यातील विदारक चित्र

उद्योगांसाठी अडथळे कायम; प्रशासकीय कूर्मगतीसह कुशल कामगारांचा तुटवडा, राज्यातील विदारक चित्र

मुंबई : सुमारे ३५ लाख सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग (एमएसएमई) असलेल्या आणि त्यातही सुमरे २० लाख सूक्ष्म उद्योग असलेल्या महाराष्ट्रात औद्योगिक वातावरण असले तरी ही वरवरची स्थिती आहे, असेच म्हणावे लागेल. उद्योग राज्यात यावेत अशी वक्तव्ये जवळपास प्रत्येक मंचावरून केली जात असताना एखादा उद्योग सुरू करण्यापूर्वी अनेक दिव्यातून उद्योजकाला जावे लागत आहे. त्यातच राजकीय दबावाची उद्योगांना भीती वाटते आहे. त्यातच स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे दबाव आणले जात असून बँका आणि वित्तसंस्थांकडून योग्य प्रमाणात तसेच वेळेवर पतपुरवठाही होत नाही. यामुळे राज्यातून उद्योग बाहेर जाण्याचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.यासंदर्भात एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी मटाला सांगितले, देशात आज ६.३३ कोटी एमएसएमई आहेत. त्यापैकी सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रात आहेत. उद्योजक स्वतःच्या पदरचे भांडवल टाकून उद्योगाची उभारणी करतो आहे. परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या उद्योगविषयक योजना या उद्योजकापर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. या उद्योजकाचे सरकारकडून खऱ्या अर्थाने सर्वच बाबतीत हँडहोल्डिंग होत नसल्याचे चित्र आहे. उद्योगांना अपेक्षित असलेल्या सोयीसुविधा राज्य सरकार राबवत नसल्यामुळे उद्योग शेजारी राज्यांत मोठ्या प्रमाणावर जात आहेत.

अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र राज्याकडे औद्योगिक धोरण आहे. परंतु त्याची अंमलबजावणी चोख होते आहे का, यातून नेमके कसे फायदे मिळत आहेत याविषयी निश्चित आकडेवारी उपलब्ध होत नाही किंवा ती प्रसिद्ध केली जात नाही. राज्य सरकार स्वतःच्या औद्योगिक धोरणाची प्रसिद्धीच करत नाही. त्या तुलनेत अन्य राज्ये मात्र आपल्याकडील माध्यमांतून त्यांच्या औद्योगिक धोरणांची जोरदार प्रसिद्ध करताना दिसतात.

राज्यातील चित्र विदारक

– उद्योजकाचा प्रस्ताव मंजूर होण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो.
– औद्योगिक जमिनीचा भाव सर्वाधिक आहे.
– एमआयडीसीतील उद्योगांसाठी असलेले भूखंड मिळण्यात अनेक अडचणी येतात.
– ग्रामीण भागा उद्योग फोफावत आहेत. परंतु इथे कुशल मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे.
– पुरवठा साखळीच्या समस्या.
– उद्योगांवर राजकीय दबाव आणला जातो.
– माथाडी संघटनांचा अनावश्यक त्रास उद्योगांना होत आहे.
– चार ते साडेचार लाख एमएसएमई उद्योग सद्यस्थितीत आजारी आहेत
(पूर्वार्ध)

एसएमई विभाग वेगळा हवा

छोट्या उद्योगांचे प्रश्न सोडवले जावेत यासाठी उद्योग मंत्रालयांतर्गत एसएमई विभाग स्थापन केला जावा, अशी मागणी २००९मध्ये एसएमई चेंबर ऑफ इंडियाने केली होती. त्याची दखल घेत तत्कालीन राज्य सरकारने हा विभाग स्थापन केला. मात्र त्यानंतर हा विभाग उद्योग सचिव, प्रधान सचिव (उद्योग) अशा विविध व्यक्तींअंतर्गत फिरत राहिले. या पार्श्वभूमीवर एसएमईंसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला जावा आणि त्यासाठी कायमस्वरूपी एक सचिव नेमण्यात यावा, अशी जोरदार मागणी एसएमई चेंबर ऑफ इंडियाने केली आहे. यामुळे एमएसएमईंचे प्रश्न सुटायला मदत होईल आणि या उद्योजकांना त्यांच्या मागण्या सरकार दरबारी नेण्यासाठी निश्चित मार्ग मिळेल याकडे चेंबरने लक्ष वेधले आहे.
आठ महिने पगाराविना; देशभरातील वस्रोद्योग कर्मचाऱ्यांची वाताहत, मुंबईत ८ हजार कर्मचारी
मार्केटिंग कौशल्य नसल्यामुळे तसेच यासाठी स्रोत उपलब्ध नसल्यामुळे एमएसएमई मागे पडत आहेत. बाजारपेठेचे विश्लेषण नसणे तसेच ब्रँडिंग, उत्पादन आणि पॅकेजिंग यांमध्ये पुरेशी व्यावसायिकता नसणे यामुळे एमएसएमईंचे नुकसान होते. एमएसएमई क्षेत्रासाठी उत्पादनसंलग्न सवलत योजना राबवणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना विस्तार करता येईल आणि यशस्वी होता येईल.- अनंत सिंघानिया, अध्यक्ष, इंडियन मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed