विशेष पोलिस निरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, डॉ. चव्हाण यांनी ही माहिती दिली. चार जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर गुन्ह्यांचे स्वरूप पाहून योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात अवैध धंदे चालविणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे. याशिवाय रेकॉर्डवरील आरोपींचा शेाध त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबतही आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय महिलाविरोधातील गुन्ह्यांबाबत तातडीने कारवाई करावी. तसेच वैवाहिक त्रासाच्या प्रकरणांमध्येही पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सांगितले.
डॉ. चव्हाण म्हणाले की, चार जिल्ह्यांत आतापर्यंत १,५८० अपघात झाले आहेत. त्यात सर्वाधिक बळी बीड जिल्ह्यात गेले. या जिल्ह्यात गेल्या वर्षात ४६२ जणांचा जीव गेला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघातात मृत्यु झालेल्यांची संख्या ४३७ इतकी आहे. या वर्षात ४८२ जणांचा जीव गेला आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४६ आणि बीड जिल्ह्यात १३९ इतकी संख्या आहे. या अपघातासाठी बेदरकारपणे वाहने चालविणे , वाहतूक नियमांचे पालन न करणे अशामुळे हे अपघात झालेले आहे. या अपघातात २० ते ३५ वर्षाच्या तरूणांचे बळी जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे याबाबत जनजागृती करून अपघाताचा आकडा कमी करून, लोकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
जनसंपर्कावर भर
ग्रामीण भागात झेंडा, पुतळा तसेच इतर काही प्रकारावरून समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटना कमी करून समाजात तेढ निर्माण होऊ नये. यासाठी ग्रामीण भागात जनसंपर्क वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सायबर किंवा सोशल मीडियावरून अफवा पसरविणाऱ्यांवर सध्या कारवाई सुरू आहे. आगामी काळात कारवाई वाढणार आहे.
सोन्याचे दर वाढल्याने पोलिसांची वाढली चिंता
उन्हाळ्यात गावांमध्ये अनेक जण रात्री उघड्यावर झोपतात. अशा ठिकाणी किंवा शेतवस्त्यांवर दरोडा, जबरी चोरीच्या घटना होण्याची शक्यता आहे. यासाठी ग्रामरक्षक दल पुन्हा कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सध्या सोन्याचे दर वाढले असल्याने या घटना वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाहन चोरांविरोधात कारवाईसाठी प्रयत्न
जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या आसपासच्या भागातून येणारे चोर हे शहरातून वाहने चोरी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागात वाहनांच्या तपासणीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन अशा चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न कायम राहणार असल्याची माहिती डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.
आठशे पोलिस कर्मचाऱ्यांचा तुटवडा
चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चार जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालयांना भेटी दिल्या. या भेटीत उपलब्ध मनुष्यबळ आणि होणाऱ्या गुन्ह्यांबाबत माहिती घेतली. या माहितीत परिक्षेत्रातील चार जिल्ह्यात आठशेच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी भरतीत हा तुटवडा कमी होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.