• Thu. Mar 19th, 2026

    औद्योगिक आस्थापनांनी सामंजस्याने कामगारांचे प्रश्न सोडवावेत – कामगार मंत्री सुरेश खाडे

    ByMH LIVE NEWS

    May 24, 2023
    औद्योगिक आस्थापनांनी सामंजस्याने कामगारांचे प्रश्न सोडवावेत – कामगार मंत्री सुरेश खाडे

    मुंबई, दि. 24 : राज्यात विविध उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमध्ये लाखो कामगार काम करतात. कामगारांशिवाय उद्योग चालू शकत नाही. अनेक वेळा कामगार व औद्योगिक आस्थापनांमध्ये वाद- विवाद होत असतात. अशा परिस्थितीत औद्योगिक आस्थापनांनी कामगारांचे प्रश्न सामंजस्याने सोडवावेत, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

    सह्याद्री अतिथीगृह येथे सभागृहात कामगारांविषयी विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कामगार मंत्री श्री. खाडे बोलत होते. बैठकीला आमदार सचिन अहिर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल, कामगार आयुक्त श्री. देशमुख, बाष्पके संचालक श्री. अंतापूरकर आदींसह कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री श्री. खाडे म्हणाले, कंपनीने कामगांरांना न्याय देताना समन्यायाचा विचार करावा. कामगारांनी कंपनीचे उत्पादन वाढविण्यासाठी काम करावे, तर कंपनीने कामगारांच्या भल्यासाठी काम केले पाहिजे. काही प्रश्न असल्यास चर्चेतून सोडविण्यात यावे. कामगार संघटनांनी कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करून मार्ग काढावा. कंपनीने कामगारांचे हित बघून निर्णय घ्यावे.

    बैठकीत आमदार सचिन अहिर यांनी प्रश्न मांडले. बैठकीला कंपन्यांचे अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    *****

    निलेश तायडे/ससं/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed