• Fri. Mar 20th, 2026

    आमच्या बड्या नेत्यांवर बोलाल, तर मुलाहिजा ठेवणार नाही, शेलारांनी भरसभेत ‘मित्राला’ सुनावलं

    आमच्या बड्या नेत्यांवर बोलाल, तर मुलाहिजा ठेवणार नाही, शेलारांनी भरसभेत ‘मित्राला’ सुनावलं

    मुंबई : “तुम्ही उत्तम बोलता, तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहात, पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोललं पाहिजे आणि बोलल्यावर तुमचं खरंच असेल, असं मानण्याचं कारण नाही” अशा शब्दात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावलं. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची विशेष बैठक मुंबईत पार पडली. यावेळी शेलार राज ठाकरेंवर बरसले. राज आणि शेलार यांच्यातील राजकारणापलिकडची मैत्री सर्वश्रुत आहे. मात्र या उघड टीका-प्रत्युत्तरांनंतर तिला तडा जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

    “सन्माननीय राज ठाकरेंना आमचं निवेदन आहे. होय, तुम्ही उत्तम बोलता, तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहात. पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोललं पाहिजे आणि बोलल्यावर तुमचं खरंच असेल, असं मानण्याचं कारण नाही. व्यक्तिगत संबंधात तुम्ही व्यक्तिगत टीका केली तर आम्ही उत्तर देणार नाही, पण तुम्ही जर माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली, तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही” असा इशाराच आशिष शेलारांनी दिला.

    “दोन हजाराची नोट मागे घेण्याचा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती आहे म्हणे, ही धरसोड नाही, तर जे सुटलेले आहेत, त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे. आरबीआयचं धोरण आहे क्लीन नोट पॉलिसी. अनेक चर्चा आणि बैठका झाल्या, तज्ज्ञांनी आपली मतं दिली, त्यानंतर हे धोरण आखण्यात आलं. तुमच्या गावात तरी हा विषय आहे का?” असा बोचरा सवाल आशिष शेलारांनी विचारला.

    “ज्यावेळी दोन हजाराची नोट दिली, त्याचवेळी ही तात्पुरती व्यवस्था असल्याचं मोदी सरकार आणि आरबीआयने सांगितं होतं. सहा लाख ३२ हजार कोटी मूल्याच्या नोटांपैकी जर तीन लाख कोटीच्या नोटाच चलनात असतील, तर उरलेल्या नोटा कुठे लपल्यात हे शोधायला नको का? चोर पकडले गेले पाहिजेत की नाही? हे राज जींना सांगा. मोदीजी प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात त्याला प्रामाणिकतेने जगण्याचं स्थान मिळावं म्हणून करतात” असं शेलार म्हणाले.

    सतेज पाटलांना आता बंटी म्हणणं बंद करा, अजित पवारांनी भरसभेत मुद्दा काढला, कारण सांगितलं

    वादाला तोंड कुठे फुटलं?

    राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीमधील विजयाबाबत बोलताना भाजपच्या वागणुकीचा पराभव असल्याचा आरोप केला होता. यावरुन आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं. या टीकेवरुन राज ठाकरेंनी प्रतिहल्ला चढवला होता.

    इच्छुकांची भाऊगर्दी, लॉबिंगही सुरु, ‘या’ ६ आमदारांपैकी कुणाच्या डोक्यावर मंत्रिपदाचा मुकुट?
    “मुळात पहिल्यांदा काय आहे, ज्यांची पोहोच नसते त्यांना हे सुचू शकतं. ही कोण लोकं आहेत, निवडणुका असतात त्यावेळी नाक्यावर सभा घेणारी ही लोकं आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी आशिष शेलारांना लगावला होता. काही गोष्टी विरोधकांच्या असल्या तरी त्या मान्य केल्या पाहिजेत. जर तो मोठेपणा नरेंद्र मोदी दाखवू शकतात तर त्यांच्या पक्षातला खालच्या लोकांना त्या गोष्टी कळल्या पाहिजेत” असं राज ठाकरे म्हणाले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *