• Sat. Sep 21st, 2024
Sambhaji Nagar News : भर उन्हाळ्यात वीज वापर घटला; कृषीपंपासाठीही मागणी कमी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसामुळे एप्रिल आणि मे महिन्यात जास्त तापमानाचे दिवस कमी आहेत. परिणामी, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विजेची कमी मागणी होती. मे महिन्याचा दुसरा आठवडा वगळता विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ नाही. तापमानामुळे विजेची मागणी वाढली, तरी तुटवडा निर्माण होणार नाही, असे ‘महावितरण’ने स्पष्ट केले.वाढते तापमान आणि कोळशाचा तुटवडा या कारणांमुळे मागील वर्षी वीज टंचाईचा सामना करावा लागला होता. काही दिवस भारनियमनाचे संकट निर्माण झाले होते. तीव्र तापमानात विजेची मागणी वाढत असल्यामुळे तुटवडा निर्माण होतो. यावर्षी भर उन्हाळ्यातही विजेची मागणी स्थिर आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात २३२.९९ दशलक्ष युनिट विजेची मागणी होती. ग्रामीण मंडळात ३८३.४१ दशलक्ष युनिट अशी जिल्ह्यात ६१६.४ दशलक्ष युनिट वीज वापरली गेली होती. या वर्षी एप्रिल महिन्यात शहर मंडळात २२७.३१ दशलक्ष युनिट आणि ग्रामीण मंडळात ३३६.५६ दशलक्ष युनिट वापरली गेली. जिल्ह्यात एकूण ५६३.८६ दशलक्ष युनिट विजेची मागणी होती.

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, तारीख लक्षात ठेवा! DA बाबत मोठी अपडेट, महागाई भत्ता या दिवशी जाहीर होईल
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५३ दशलक्ष युनिट वीज कमी वापरली गेली आहे. यावर्षी मार्च महिन्यात शहरात २१५.७१ दशलक्ष युनिट, ग्रामीण भागात ३६१.९० दशलक्ष युनिट अशी जिल्ह्यात एकूण ५७७.६१ दशलक्ष युनिट विजेची मागणी होती. मे महिन्यातही विजेच्या मागणीत फारसा फरक पडलेला नाही. गेल्या वर्षी मे महिन्यात जिल्ह्यात ५७३.८५ दशलक्ष युनिट विजेची मागणी होती. यंदा तुलनेने कमी मागणी आहे, असे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या आठवड्यातही ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाची शक्यता आहे. वातावरण आल्हाददायक असल्याने वातानुकूलन यंत्रणा, पंखे, कूलर यांचा वापर नियंत्रित आहे. औद्योगिक क्षेत्रातही तुलनेने नियंत्रित वापर असल्याने विजेची मागणी स्थिर आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील वीज वापरावर मागणीत चढ-उतार होतात.

कृषीपंपासाठीही मागणी कमी

ग्रामीण भागात रब्बी हंगामात कृषी पंपांसाठी सर्वाधिक वीज वापर होतो. तुलनेने उन्हाळी पिकांचे क्षेत्र मर्यादित आहे. परिणामी, वीज वापर घटल्याने मागणी कमी झाली आहे. पावसाळ्यातही ग्रामीण भागात विजेची मागणी कमी असते.

भारनियमनाची शक्यता नाही

राज्यभरात वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. उन्हाळ्यात भारनियमनाची शक्यता होती. मात्र, तुलनेने विजेची मागणी घटल्यामुळे वीज तुटवडा निर्माण झाला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत भारनियमनाची शक्यता नाही. ग्रामीण भागातही वीजपुरवठा सुरळीत असून, नियमित वीजबिल भरणा करण्यासाठी ‘महावितरण’ने मोहीम राबविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed