अहमदनगरमध्ये अक्षय्य तृतीयेपासून आंबा खाण्याचा सिझन सुरू झाल्याचे मानले जाते. यावर्षी २२ एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. त्या आधीच आंब्याची आवक वाढली असून भावही कमी झाले आहेत. त्यामुळे यावर्षी सर्वांसाठीच आंबा गोड ठरण्याची शक्यता आहे, असा विश्वास नगरमधील सर्वांत जुनी आंबा फळआढीचे संचालक अज्जुशेठ, जगदीश व कैलास आहुजा यांनी व्यक्त केला.
आंब्याच्या भावाबद्दल त्यांनी सांगितले की, देवगड व रत्नागिरी हापूस ७०० ते एक हजार रुपयांना दोन डझन, रत्नागिरी पायरी ७०० ते एक हजार रुपयांना दोन डझन, लालबाग २५० ते ३०० रुपयांना दोन डझन, म्हैसूर ३०० ते ७०० रुपयांना दोन डझन, रत्नागिरी पायरी ७०० ते हजार रुपये दोन डझन, म्हैसूर पायरी ४०० ते ६०० रुपये दोन डझन असा सध्या भाव आहे. आवक वाढली तर आणखी भाव कमी होऊ शकतात, असाही अंदाज आहे.
यावर्षी आंब्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. स्थानिक बाजारपेठेत येणाऱ्या स्थानिक आंब्यावर याचा परिणाम होणार आहे. यासंबंधी अज्जुशेठ आहुजा म्हणाले, महाराष्ट्र व इतरत्र अवकाळी पाऊस झाला आहे. मात्र, रत्नागिरी भागात हा पाऊस नसल्याने शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे आंबा मालाची आवकही भरपूर झाली आहे. त्यामुळे भाव आताच कमी झाले आहेत.
स्थानिक आंबा बाजारात येण्यासाठी अद्याप वेळ आहे. तोपर्यंत या आंब्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होणार आहे. नैसर्गिकरित्या पिकविलेल्या आणि खात्रीशीर आंब्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.