जळगाव: गोठ्यातील गुरांसाठी शेतातून कडबाकुट्टी आणत असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरसह बांधालगत असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या विहिरीत कोसळला. यावेळी ट्रॅक्टर अंगावर पडल्याने त्याखाली दबून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सामरोद येथे घडली. या घटनेत सुपडू सुकदेव देसाई (वय ६५ वर्ष, रा. सामरोद ता. जामनेर) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.सामरोद येथील रहिवासी सुपडू देसाई हे शेती करत. गोठ्यातील गुरांना कडबा कुट्टी आणण्यासाठी ते शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले होते. या ठिकाणी त्यांनी शेतातून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कडबा कुट्टी भरली. त्यानंतर ते कडबाकुट्टी भरलेला ट्रॅक्टर घेऊन घराकडे असलेल्या गोठ्याकडे निघाले, मात्र काही अंतरावर चालक सुपडू देसाई यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. कडबा कुट्टीसह भरलेले ट्रॅक्टर देसाई यांच्या शेताच्या बांधालगत असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत कोसळले. ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत अंगावर पडल्याने, त्याखाली दबून सुपडू देसाई यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सामरोद गावाचे सरपंच श्रीकांत पाटील व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने आधी ट्रॅक्टर ट्रॉली काढण्यात आले. त्यानंतर सुपडू देसाई यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच सामरोद गावाचे सरपंच श्रीकांत पाटील व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने आधी ट्रॅक्टर ट्रॉली काढण्यात आले. त्यानंतर सुपडू देसाई यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
घटनेची माहिती मिळाल्यावर जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, तसेच घटनेचा पंचनामा केला.
रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी
दरम्यान शेतात त्यांचा मुलगा दुसरे काम करत होता, घटनेची माहिती मिळाल्यावर त्याला धक्का बसला. घटनास्थळ गाठल्यावर त्याने प्रचंड आक्रोश केला. मयत सुपडू देसाई यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी डॉ हर्षल चांदा यांनी दिलेल्या खबरीवरुन जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.