• Sat. Sep 21st, 2024

मुंबईकरांचे पाणी आटले! अनेक भागांत १ ते २ दिवसांआड पाणी, धरणांमध्ये 'इतके'च पाणी शिल्लक

मुंबईकरांचे पाणी आटले! अनेक भागांत १ ते २ दिवसांआड पाणी, धरणांमध्ये 'इतके'च पाणी शिल्लक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे आधीच सुरू असलेली किमान १५ टक्के पाणीकपात आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव व धरणांमध्ये ३२ टक्केच शिल्लक असलेला जलसाठा यामुळे पाण्याचा खडखडाट जाणवू लागला आहे. याचा फटका मुंबईकरांना बसत असून अनेक भागांत एक ते दोन दिवसांआड पाणी येत आहे. जलसाठाच कमी असल्याने मुंबई पालिकेसमोरही पाणी नियोजनाची समस्या निर्माण झाली आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे खोदकामामुळे हानी पोहोचली. दुरुस्‍तीसाठी जलबोगदा बंद करावा लागला व त्या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविणे आवश्‍यक झाल्याने ३१ मार्चपासून मुंबई पालिकेला एक महिन्यासाठी १५ टक्के पाणीकपात करावी लागली आहे. पाणीपुरवठा करताना मुंबई शहर व उपनगरातील काही भागांत, उंचावर राहणाऱ्या आणि पाणीवाटप क्षेत्राच्या टोकाकडील लोकवस्तीस १५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीकपात जाणवू शकते, असे पालिकेकडून ५ एप्रिलला स्पष्ट करण्यात आले होते. ही परिस्थिती कायम असून १५ टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीकपात असल्याची तक्रार मुंबईकर करू लागले आहेत.

सकाळी साडेआठ वाजता अर्धा ते एक तासासाठी येणारे पाणी कधी कधी १५ मिनिटांसाठीच येत असल्याचे जोगेश्वरी पूर्वेला हिलमार्क या परिसरात राहणारे शाहनवाज यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याअभावी काही कामे बाजूला ठेवावी लागत असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेला असलेल्या अक्सा मशिद, हिल पार्क परिसर, मालाडमध्ये भंडारपाडा, कुंभारपाडा, राजन पाडा, ओर्लेम चर्च परिसर, कांदिवली चारकोप परिसर, बोरिवली एक्सर, बोरिवली शिंपोली, अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी यासह अन्य भागांत पाणीकपातीचा मोठा फटका बसत आहे.

चेंबूरमधील ‘या’ लेनमध्ये मिळतात स्वस्तात चप्पला, मुंबईतील सर्वात मोठं मार्केट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलाव व धरणांमध्ये ३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सन २०२२मध्ये एप्रिल महिन्यात याच काळात ३४.६५ टक्के पाणीसाठा होता. पावसाळा आणखी दोन महिन्यांवर असून कमी पाणीसाठा असल्याने पाणीपुरवठ्याचे अवघड नियोजन पालिकेला करावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed