• Sat. Sep 21st, 2024

शेतकऱ्यांनी अर्धा राज्य महामार्ग केला बंद! डोंबिवली बदलापूर पाइपलाइन रोडवरील वाहतुकीला फटका

शेतकऱ्यांनी अर्धा राज्य महामार्ग केला बंद! डोंबिवली बदलापूर पाइपलाइन रोडवरील वाहतुकीला फटका

कल्याण : शेतकऱ्यांनी डोंबिवली बदलापूर पाइपलाइन रोड या राज्य महामार्गाची एक मार्गिका वसार गाव येथे बंद केली आहे. १९७२ मध्ये झालेल्या भूसंपादनात एमआयडीसीनं एक जागा संपादित केल्याचं दाखवून दुसऱ्याच जागेवर रस्ता आणि पाइपलाइन टाकली. त्यामुळं दोन्ही जागा गेल्या ५० वर्षांपासून अडकून पडल्याचं सांगत शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी एमआयडीसीला २० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत प्रश्न न सुटल्यास पूर्ण राज्य महामार्ग बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.डोंबिवली-बदलापूर पाइपलाइन रोड या राज्य महामार्गासाठी वसार गावातील शेतकऱ्यांची जागा एमआयडीसीने १९७२ मध्ये संपादित केली होती. बारवी धरणातून ठाण्याकडे जाणारी पाण्याची पाइपलाइन आणि राज्य महामार्ग बांधण्यासाठी ही जागा एमआयडीसीने ताब्यात घेतली. मात्र कागदोपत्री नोंद करताना प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या जागेऐवजी रस्त्याच्या बाजूच्या जागेवर एमआयडीसीनं फेरफाराची नोंद केली. त्यामुळे ज्या जागेवर रस्ता आहे ती जागाही गेली आणि बाजूच्या जागेवर एमआयडीसीची नोंद असल्यामुळे त्या जागेवरही काहीच करता येत नाही, अशा दुहेरी कोंडीत शेतकरी अडकले.

कागदोपत्री गोंधळाबाबत गेल्या ५० वर्षांपासून शेतकऱ्यांकडून एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, ही निव्वळ कागदी चूक सुधारण्यासाठी एमआयडीसीने गेल्या ५० वर्षांत स्वारस्यही दाखवलं नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी केला आहे. आम्हला जागेचा मोबदला तरी द्या अन्यथा तोडगा तरी काढा, अशी मागणी करत राज्य महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबतचे बॅनरही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला लावले होते. त्यानंतरही एमआयडीसीकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अखेर आज वसार गावातील शेतकऱ्यांनी डोंबिवली-बदलापूर राज्य महामार्गाची एक मार्गिका बंद केली. यानंतर एमआयडीसीला शेतकऱ्यांनी २० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत जर भूसंपादनाचा तिढा सुटला नाही, तर राज्य महामार्गाच्या दोन्ही मार्गीका बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांकडून हा रस्ता बंद केला जात असताना या ठिकाणी एमआयडीसी अधिकारी आणि पोलिसही उपस्थित होते. याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं. आम्ही या प्रश्नाबाबत आमच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवलं आहे. लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल, अशी प्रतिक्रिया एमआयडीसीचे उपअभियंता विजय शेलार यांनी दिली. त्यामुळे आता तरी हा प्रश्न सोडवायला एमआयडीसीला जाग येईल का? हे पहावं लागेल.

काय आहे मूळ प्रकरण…..

डोंबिवली बदलापूर पाइपलाइन रोडवरील बारवी धरण पाणीपुरवठा योजनेसाठी एमआयडीसीने शेतकऱ्यांच्या जागांचे भूसंपादन केले होते. वसार गावातील शेतकऱ्यांची जमीनही यामध्ये भूसंपादित झाली होती. शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्याची आगाऊ रक्कमही शासनाकडून देण्यात आली होती. मात्र एमआयडीसीने भूसंपादनासाठी मंजूर केलेली जमीन संपादीत न करता दुसरीच जमीन संपादीत केली, अशी तक्रार वसार गावातील शेतकरी नरेश वायले यांनी केली आहे. एमआयडीसीने भूसंपादित केलेली जमीन व शेतकऱ्यांची खासगी जमीन दोन्ही भूखंडावर एमआयडीसी आपला हक्क सांगत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खासगी जमिनीचा काहीही वापर करता येत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. खासगी जागेवर व्यवसाय करण्यासाठी एमआयडीसी अधिकारी निधी मागत असल्याचा आरोपही वायले यांनी केला होता.

बीअर घेण्यासाठी आला, दुकान मालकाचा ७० हजारांचा मोबाइल घेऊन पळाला; डोंबिवलीतील घटना
भूसंपादन झालेली जमीन एमआयडीसीला देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र खासगी जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. या मागणीकडे एमआयडीसी अधिकारी लक्ष देत नाहीत. याविषयी शेतकरी शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. अंबरनाथ येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयानेही एमआयडीसीला पत्रव्यवहार केला आहे. एमआयडीसी पाइपलाइन व रस्त्याची वहिवाट यातील भूसंपादन नोंदणी नकाशात तफावत असल्याचे आढळून आल्याचा अहवाल दिला आहे. तशी मोजणी नकाशाची प्रतही एमआयडीसी कार्यालयास भूमि अभिलेखाकडून देण्यात आली आहे. वायले यांच्याप्रमाणेच येथील आणखी शेतऱ्यांच्याही खासगी जमिनीवर एमआयडीसीने अतिक्रमण केले आहे. एमआयडीसी अधिकारी याकडे गांर्भियाने लक्ष देत नसल्याची तक्रार वसार गावातील शेतकरी करत आहेत.

आम्हाला तिखट बोलता येत पण आम्ही मर्यादा पाळतो; एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर पलटवार

गेली अनेक वर्षे शेतकरी यासाठी लढा देत आहेत. मात्र त्यावर निर्णय होत नसल्याने भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पावसाळ्यात या महामार्गाची दुरावस्था झाल्याने पावसाळ्यानंतर एमआयडीसीने या रस्त्याची डागडुजी काम हाती घेतले होते. वसार गावाच्या हद्दीत मात्र रस्त्याची डागडुजी करण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्याने या भागातील रस्त्यााची दुरावस्था कायम आहे. आधी आमच्या जमिनीचा प्रश्न सोडवा नंतर महामार्गावरील खड्डे बुजवावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed