एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या झाडाझडती होत आहेत. अशातच कारखान्याच्या कराराचा भंग केला असे म्हणत सतेज पाटील यांच्या राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या २९ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी २९ मार्च रोजी त्यांना अपात्र ठरवले होते. याचा सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला होता.
या निर्णयाविरोधात सतेज पाटील गटाने प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्याकडे ३१ मार्च रोजी अपील दाखल केले होते. तसेच लाखभर कागदपत्रे देखील पुरावा म्हणून सादर केले होते. यावर मंगळवार ४ व गुरुवार ६ एप्रिल रोजी सुनावणी पूर्ण झाली. अपील दाखल झाल्या तारखेपासून दहा दिवसात यावर निर्णय देणे बंधनकारक असल्याने याचे पालन करत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी रविवार काल रात्रीच १२ वा. संबंधितांना निकालाच्या प्रती पोहोचवत अपील नामंजूर केली आहे. यामुळे सतेज पाटील यांना निवडणुकीत दुसऱ्यांदा धक्का बसला आहे.
या निर्णयाविरोधात सतेज पाटील गटाचे राजश्री शाहू परिवर्तन आघाडी उच्च न्यायालयात जाणार आहे. सध्या राजाराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून बुधवार दिनांक १२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून गुरुवार १३ एप्रिल रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे. तर २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आमदार सतेज पाटील आता काय भूमिका घेणार याकडे मतदार सभासदांचे लक्ष लागले आहे.