• Sat. Jun 6th, 2026
    मराठ्यांनो पत्रिका कुंडल्या पेटवून द्या, कर्ज काढून लग्न करु नका, ९६ कुळाचा बाऊ करु नका

    कोल्हापूर : लग्नासाठी खोट्या जाहिराती व आर्थिक फसवणुकीपासून सतर्क रहा तसेच अधार्मिक दोन दक्षता पद्धत बंद करून कुंडली न बघता मुला मुलींच्या कर्तृत्वाला प्राधान्य द्या. मुलांच्या कुंडल्या पेटवून द्या आणि ९६ कुळाचा बाऊ न करता सर्व मराठा म्हणून एकत्र येऊन लग्न ठरवा, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे. ते कोल्हापुरात मराठा समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. मराठा समाजातील लोकांनी कर्ज काढून सण साजरे करण्यापेक्षा स्वतःसाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपण कसे उपयोगी पडू हे पाहावं, असे ते यावेळी म्हणाले.अखिल भारतीय मराठा महासंगातर्फे कोल्हापुरात मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी समाजाला संबोधित केले. यावेळी त्यांनी मराठा समाजातील लोकांच्या अडचणी जाणून घेत समाजाच्या प्रगती आणि उन्नतीसाठी काय काय करता येईल, यासाठी मार्गदर्शन केलं. मराठा समाजाच्या वधू वर मेळाव्यात वधू-वरांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढवली पाहिजे. लग्नासाठी खोट्या जाहिराती व आर्थिक फसवणुकीपासून सतर्क राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

    मराठा समाजाने पत्रिका कुंडली याच्यात अडकू नये. मुला मुलींच्या कर्तृत्वाला प्राधान्य द्यावं. ९६ कुळाचा बाऊ न करता सर्वांनी मराठा म्हणून एकत्र येऊन लग्न ठरवावं. अक्षतांची नासाडी न करता मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित लग्न करता येतंय का हे पाहावं. जेणेकरुन होणारा खर्च वाचवून वधू-वरांच्या भविष्यासाठी त्यांच्याच नावाने ठेव म्हणून ते पैसे ठेवता येतील, असं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं.

    सध्या मराठा समाज अनेक प्रकारच्या अडचणीत आहे. नोकरी, जमीन, शिक्षण नसल्याने तरुणांची लग्न होत नाहीयेत. शिवाय अनेक जण कर्ज काढून सण साजरे करतात. मात्र असे न करता आपण प्रगतीकडे कशी वाटचाल करू याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. चैत्र पाडव्याच्या निमित्ताने मी अनेक गावांमध्ये फिरलो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १७ लाख मराठा आहेत, पण काम नसल्याने एका एका गावात ५०-६० तरुण रिकामे बसत असल्याचं आढळलं. या मुलांची लग्न जमत नाहीत ही परिस्थिती गंभीर आहे. मराठा समाजातील लोकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. या योजनांचा तरुणांनी फायदा करून घ्यावा. सध्या मुलींच्या अपेक्षा वाढल्या असल्याने लग्न ठरवणे ही तारेवरची कसरत होत आहे. म्हणून अनेक एजंट याचा गैरफायदा घेऊन पालकांना फसवत आहेत. मात्र या फसवणुकीपासून आपण सावध राहिले पाहिजे. मराठ्यांनी आता जागे व्हायची वेळ आलीये, अशी कळकळीची विनंती त्यांनी सरतेशेवटी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed