गैरसमज नका करू, इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनीही ध्यानात घ्यावं. तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. आमच्या टीममध्ये ११ मुली आहेत. एकूण २० जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे आम्ही मानधन घेतो, पण महाराज सांगतात तेवढंही घेत नाही. तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाली.
ते महाराज आहेत – गौतमी पाटील
ते महाराज आहेत, मी काय बोलणार त्यांच्याविषयी, फक्त गैरसमज नका करू. महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनीही ध्यानात घ्यावं. माझ्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. प्रेक्षक उपस्थित राहून आनंद घेतात, एन्जॉय करतात. इतकी मोठी गर्दी होत असेल तर मी माझ्यासाठी मला संरक्षण मागणारच ना? महाराजच नव्हे तर कुणीही काही बोललं, टीका केली तरी माझं काम सुरूच राहणार आहे. मला काही अडचण नाही. कारण मी कशी आहे हे माझं मला माहिती आहे. मी मानधन किती घेते ते मला माहीत आहे. कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना माहीत आहे. आज मी पुन्हा उभी राहिली आहे ती फक्त प्रेक्षकांमुळेच. प्रेक्षकांनी मला कोणत्याही गोष्टी जाणवू दिल्या नाहीत. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी सपोर्ट केल्यामुळे मी जिद्दीने अडचणीच्या काळात उभा राहिलीय, असंही गौतमी पाटील म्हणाली.
घुंगरू चित्रपटाचं शेवटचं चित्रिकरण करण्यासाठी आली होती गौतमी
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. घुंगरू असं सिनेमाचं नाव आहे. घुंगरू सिनेमाच्या माध्यमातून तिचं मोठ्या पडद्यावर पदार्पण होत आहे. माढ्यात या सिनेमाचं शेवटचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी गौतमी माढा येथे आली होती. घुंगरू सिनेमा विषयी तिने भरभरून माहिती दिली. लोककलावंताची व्यथा मांडणारा घुंगरू महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक करत असतात. प्रेक्षकांमुळेच आज मी उभी आहे. माझ्यावर जसं प्रेम केलं तसं महाराष्ट्रातील चाहत्यांनी घुंगरु चित्रपट पाहून प्रेम दाखवावं, असं आवाहन गौतमीने केले आहे.