• Fri. Sep 18th, 2026

भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा : आज उच्चस्तरीय टास्क फोर्स शहरात – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 16, 2026

अमरावती, दि. १६: अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय टास्क फोर्स गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना व अभिप्राय जाणून घेण्याकरिता अमरावती  विभाग दौऱ्यावर येत आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती  विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे आणि  जिल्हाधिकारी आशिष येरेकर  यांनी केले आहे.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली  उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5.30 अमरावती विभागातील हितधारकांच्या सूचना व अभिप्राय ऐकूण घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून टास्क फोर्स समोर आपले विचार मांडण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात प्रत्यक्ष तसेच  ईमेलद्वारे सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय यापूर्वीच मागविण्यात आले होते.

जिल्हाधिकारी  कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचे संकलन करून उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे सादर करण्यात येतील. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed