• Sat. Sep 12th, 2026

मन हेलावणारी घटना! खिचडी ठरली प्राणघातक, चिमुकल्या सख्ख्या बहीण-भावाचा करुण अंत; आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले

Chhatrapati Sambhajinagar Brother and Sister Die due to Poisoning : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे खिचडी खाल्ल्यानंतर जुलाब व उलट्यांचा त्रास झाल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या दोन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आयुष नारायण थोटे याचा गुरुवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर उपचार सुरू असलेली गायत्री नारायण थोटे हिचाही काल शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

खिचडी खाल्ल्याने मृत्यू दोन लहान भाऊ-बहिणीचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : घरची बनवलेली खिचडी खाल्ल्यानंतर अन्नातून तीव्र विषबाधा होऊन दोन चिमुकल्या सख्ख्या बहीण-भावाचा करुण अंत झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा आणि त्याच्या सहा वर्षांच्या सख्ख्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. अवघ्या 24 तासात दोन निष्पाप बालकांची प्राणज्योत मालवल्यानं संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून, आई-वडिलांचा आक्रोश उपस्थितांचं हृदय पिळवटून टाकणारा होता.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली लिंबाजी येथील रहिवासी नारायण साहेबराव थोटे (वय 35), त्यांची पत्नी देवशाला (वय 30), मुलगी गायत्री थोटे (वय 6 वर्षे) आणि मुलगा आयुष थोटे (वय 2 वर्षे) या चौघांनी रात्री घरी बनवलेली खिचडी खाल्ली होती. मात्र, पहाटेपासूनच घरातील चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्यानं दोन्ही चिमुकल्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.

Maharashtra TimesManoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे कूच करण्याची तारीख जाहीर; राज्यभरातील मराठा बांधवांना महत्त्वाचं आवाहन

रात्रभर मृत्यूशी झुंज अपुरी

गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी पहाटे दोन वर्षांच्या आयुषला उपचारासाठी सिल्लोडकडे नेलं जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. तर, अत्यंत गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहा वर्षांच्या गायत्रीची गुरुवारी रात्रभर मृत्यूशी झुंज अपुरी पडली आणि काल शुक्रवारी सकाळी 9 वाजता तिनेही अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून आई सावरत नाही तोच मुलीचाही मृत्यू झाल्यानं हा दुहेरी डोंगर कसा सहन होणार, या भीतीनं नातेवाईकांनी गायत्रीच्या मृत्यूची बातमी आई देवशाला यांच्यापासून तब्बल 10 तास लपवून ठेवली होती.

Maharashtra TimesPrathamesh Deshmukh : ‘त्याला चहाचंही व्यसन नाही, पोलीस अधिकारी बदला’; प्रथमेश देशमुख प्रकरणात कुटुंबीयांचा संताप, पुणे पोलिसांचा दावा फेटाळला

अवघ्या पाच मिनिटे आधी आईला सांगितलं

सायंकाळी अंत्यसंस्कारासाठी गायत्रीचं पार्थिव गावात आणण्यापूर्वी अवघ्या पाच मिनिटे आधी आईला ही माहिती देण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पिशोर पोलीस ठाण्याच्या पथकानं थोटे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. अधिकारी एम. एल. सिद्दिकी यांच्या पथकाने घरातील खिचडी, अन्नधान्य आणि इतर साहित्याचे नमुने तात्काळ जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या रासायनिक विश्लेषणाचा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आले.