Mumbai Juhu Beach: पावसाळ्यात किंवा समुद्र खवळल्यानंतर टार बॉल्स समुद्र किनाऱ्याला यायचे प्रमाण वाढते.जुहू किनाऱ्याला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात टार बॉल्स येऊ लागल्याने किनारा काळवंडला.
समुद्र खवळल्यानंतर ‘टार बॉल्स’ किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण जास्त
गेल्या चार दिवसांपासून जुहू किनाऱ्यावर ‘टार बॉल्स’चे प्रमाण वाढल्याचे स्थानिक नागरिक सुनील कनोजिया यांनी सांगितले. समुद्राच्या भरतीबरोबर मोठ्या प्रमाणावर ‘टार बॉल्स’ किनाऱ्यावर येत असून काही भागांत संपूर्ण वाळू काळवंडल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात किंवा समुद्र खवळल्यानंतर ‘टार बॉल्स’ किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण वाढते. या काळात वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहत असल्याने हे टार बॉल्स किनाऱ्यावर अधिक प्रमाणात जमा होतात, असेस्थानिकांचे निरीक्षण आहे.
नागरिकांना सर्वाधिक त्रास
मोठे ‘टार बॉल्स’ हाताने किंवा साधनांच्या मदतीने उचलता येतात; मात्र लहान चिकट गोळे उचलणे कठीण ठरते. काही वेळा ते वाळूत मिसळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. टार बॉल्स वाळूत मिसळल्यानंतरच त्यांची स्वच्छता करणे शक्य होते. पावसाळ्यानंतर या प्रकारांचे प्रमाण हळूहळू कमी होते; मात्र पावसाळ्यात किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.
त्वचेची जळजळ किंवा इतर त्रास होऊ शकतो
काही नागरिक नकळत ‘टार बॉल्स’ असलेल्या पाण्यात जातात. त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका नसला तरी त्वचेची जळजळ, चिकटपणा किंवा इतर त्रास होऊ शकतो, असे कनोजिया यांनी सांगितले. त्यामुळे किनाऱ्यावर टार बॉल्सबाबत माहिती देणारे आणि खबरदारीचे निर्देश असलेले फलक लावल्यास नागरिकांना मदत होईल, अशी मागणी करण्यात येत आहे.
Sangli Crime : ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’; एकतर्फी प्रेमातून तरुणाचा मेसेजद्वारे वारंवार त्रास, कंटाळून 19 वर्षीय तरुणीने स्वत:ला संपवलं
कचरा आणि ‘टार बॉल्स’ जलचरांसाठीही धोकादाय
पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ वातावरण अनुभवता येत नाही. हा कचरा आणि ‘टार बॉल्स’ जलचरांसाठीही धोकादायक ठरू शकतात. जलचरांकडून टार बॉल्सचे सेवन होण्याची शक्यता असल्याने पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
Navi Mumbai News: नागरी सुविधा कामांच्या प्रस्तावांवर अखेर शिक्कामोर्तब झालंच;महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामांना मंजुरी
तेलकट पदार्थ तिथेच रोखणे गरजेचे
खाड्यांमधून समुद्रात जाणारा कचरा आणि तेलकट पदार्थ तिथेच रोखणे गरजेचे आहे. तेलगळती झालेल्या ठिकाणी तरंगते ‘ऑईल बूम्स’ लावून तेल एका मर्यादित भागात थांबवले जाते. त्यामुळे त्याचे टार बॉल्समध्ये रूपांतर होऊन ते किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा धोका कमी होतो. अशा उपाययोजनांचा विचार केल्यास जुहू किनाऱ्यावरील वारंवारचा ‘टार बॉल्स’चा त्रास कमी होऊ शकतो, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
