मुंबई, दि. २७ : नेपाळमधील काठमांडू येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १०६ प्रवाशांचा सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे काठमांडूहून जनकपूरपर्यंत प्रवासासाठी चार मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवाशांना २८ ऑगस्ट रोजी बिहारमधील दानापूर येथून संघमित्रा एक्सप्रेसने महाराष्ट्रात परतायचे नियोजित होते. मात्र, नेपाळमधील सद्यस्थितीमुळे काठमांडूहून मोठ्या बसने पुढील प्रवास करणे शक्य नसल्याने दानापूरपर्यंत वेळेत पोहोचण्याची अडचण निर्माण झाली होती.
प्रवाशांची ही अडचण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रवासी योगेश गावंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नेपाळमधील स्थानिक प्रशासन आणि नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशी समन्वय साधला. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंतर खासदार संदीप राणा यांनी काठमांडूहून जनकपूरपर्यंत चार मिनी बसची व्यवस्था केली. त्यानुसार सर्व १०६ प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. प्रवासी उद्या सकाळी जनकपूरमार्गे भारत – नेपाळ सीमेवर पोहोचणार असून, तेथून त्यांना बिहारमधील दानापूरपर्यंत नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दानापूर येथून रेल्वेने महाराष्ट्रात परतण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सर्व प्रवासी सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत येईपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या संपर्कात राहून आवश्यक समन्वय साधत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल योगेश गावंडे आणि सहप्रवाशांनी कृतज्ञता व्यक्त केली असून मुख्यमंत्र्यांनी स्वतः संपर्क साधून अडचण जाणून घेतली आणि तातडीने प्रवासाची व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
०००००