मुंबई, दि. २७ : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय या प्रकारात निवडीसाठी एकूण १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, महानगरपालिका/ नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) आयोजित करण्यात आली होती. या प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून विविध व्यवस्थापनांमधील एकूण १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित प्रक्रियेतून निवड झालेल्या या उमेदवारांवर विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांची जडणघडण करण्यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करावे. राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी नव्याने निवड झालेल्या शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि गुणवत्ताधिष्ठित पद्धतीने राबविण्यात येत असून निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवर निवडीची स्थिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संबंधित उमेदवारांना एसएमएसद्वारेही माहिती कळविण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
व्यवस्थापन निहाय शिफारस झालेली पदसंख्या पुढीलप्रमाणे – जिल्हा परिषद ८४८१, नगरपालिका / परिषदा २२६, महानगरपालिका १३०६, आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा १६०१, शासकीय विद्यानिकेतन ५४, खाजगी शैक्षणिक संस्था १४५१. तर पद प्रकार निहाय शिफारस झालेली पदसंख्या पुढीलप्रमाणे – इयत्ता पहिली ते पाचवी ७५४१, इयत्ता सहावी ते आठवी ४२०७, इयत्ता नववी ते दहावी १११९, इयत्ता अकरावी ते बारावी २५२ अशा एकूण १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
00000