• Sun. Aug 23rd, 2026

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील खवड्या डोंगरावरुन पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध दावे केले जात होते. पण यावरुन मृतक संगीता चांदगुडे यांच्या बहीण पल्लवी पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, ​छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून दरीत उडी घेऊन चांदगुडे कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध अफवा आणि व्हिडिओंचा पूर आला असतानाच, मयत संगीता चांदगुडे यांची बहीण पल्लवी पाटील यांनी एक भावूक व्हिडिओ जारी करत युट्यूबर्स आणि सोशल मीडिया युजर्सवर जोरदार संताप व्यक्त केला आहे.

​सोशल मीडियावर केवळ ‘आयफोन किंवा मोबाईल न घेतल्याने मुलगा कुणालने आई-वडिलांना आत्महत्येस भाग पाडले’ अशा दाव्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यावर भावनिक होत पल्लवी पाटील यांनी म्हटले, संगीता माझी मोठी बहीण, कुणाल माझा भाचा आणि मुरलीधर हे माझे मेव्हणे होते. या तिघांना गमावल्यामुळे आमच्या कुटुंबावर काय डोंगर कोसळला आहे, हे फक्त आम्हालाच माहीत आहे. आज आम्ही बहिणीची, भाच्याची आणि मेव्हण्यांची राख गोळा करायला जात असताना मोबाईलवर एकापाठोपाठ एक येणारे व्हिडिओ पाहिले. ते पाहून आमचं काळीज खाली बसलं आहे.

‘​काहीही माहिती नसताना खोट्या गोष्टी का पसरवता?’​

व्हिडिओ बनवणाऱ्यांवर थेट सवाल उपस्थित करत पल्लवी पाटील म्हणाल्या की, सोशल मीडियावर लोक कोणतीही शहानिशा न करता आपले मत मांडत आहेत. ​तुम्ही आम्हाला ओळखत नाहीत, तुम्हाला घटनेची खरी पार्श्वभूमी किंवा सत्य माहिती नाही; तरीही निव्वळ व्ह्यूज मिळवण्यासाठी खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. तुमच्या या खोट्या व्हिडिओंचा आणि अफवांचा आमच्या संपूर्ण कुटुंबाला प्रचंड त्रास होत आहे. आमचे आई-वडील सत्तरीच्या पार आहेत, त्यांचा मुलगा आणि मुलगी दोन्ही गेले आहेत. अशा परिस्थितीत या खोट्या बातम्यांमुळे त्यांचा त्रास आणखी वाढतोय, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

‘आम्ही तीन बहिणी पोरक्या झालोय, आम्हाला सावरू द्या’

​आपली उद्विग्नता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, आम्ही चार बहिणी होतो. आज मोठ्या बहिणीच्या जाण्याने आम्ही तीन बहिणी परक्या झालो आहोत. चांदगुडे कुटुंब पूर्णपणे संपलं आहे, आमचं जगणं मुश्किल झालं आहे. या आघातातातून कसं सावरायचं हेच आम्हाला सुचत नाही. त्यामुळे मृत कुणाल, माझी दीदी आणि मेव्हण्यांबद्दल काहीही लिहिण्या किंवा व्हिडिओ बनवण्याआधी माणसाने थोडा तरी विचार करायला हवा, असं पल्लवी पाटील म्हणाल्या.

‘सत्य माहीत नसताना फक्त लाइक्स,व्ह्यूज साठी व्हिडिओ’

​खवड्या डोंगर सामूहिक आत्महत्येनंतर सोशल मीडियावर व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी काही युजर्स आणि स्थानिक डिजीटल क्रिएटर्सकडून खोट्या कथा रचल्या जात असल्याचे या व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा तपास करत असताना, अशा संवेदनशील घटनेत तथ्यहीन माहिती पसरवण्याऐवजी संयम बाळगण्याचे आवाहन आता पीडित कुटुंबाकडून केले जात आहे.