• Fri. Aug 21st, 2026

पुणे आणि रायगडला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात 10 किमी लांबीचा बोगदा तयार केला जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. हा बोगदा तयार झाल्यास पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे येणाऱ्या अडथळांपासून काहीशी सुटका होईल, तसेच प्रवासाचा वेळ देखील वाचणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : पावसाळ्यात अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे महिनाभर वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागलेल्या ताम्हिणी घाटातील धोकादायक मार्गाला पर्याय म्हणून 10 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी महामार्ग विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद अमित नाईक उपस्थित होते.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा रायगड जिल्ह्यातील घाट मार्गांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ते बाधित झाले. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील राष्ट्रीय महामार्गावरही दरडी कोसळल्याने वाहतूक जवळपास महिनाभर ठप्प होती. याचा परिणाम स्थानिक नागरिकांसह रायगडच्या पर्यटन व्यवसायावरही झाला.

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

ताम्हिणी घाटातील दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन धोकादायक भाग वगळून दहा किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. बोगदा झाल्यास पावसाळ्यातील वाहतुकीतील अडथळे कमी होण्याबरोबरच प्रवासाचा वेळही वाचणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

Sunil Tatkare

ताम्हिणी घाट महिनाभर बंद ठेवल्याने स्थानिकांचे नुकसान

दरम्यान, मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात वेगवेगळ्या ठिकाणी दरळ कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे ताम्हिणी घाटचा रस्ता जवळपास महिनाभर बंद राहिला. यामुळे ताम्हिणी घाटातील पर्यटन पूर्णपणे बंद झाले. त्याचा फटका स्थानिक व्यवसायिकांना बसला आणि त्याचा परिणाम रोजगारावरही झाला. ताम्हिणी घाटातील पर्यटनावर शेकडो कुटुंबांचा रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे या मार्गावर काही पर्याय उपलब्ध झाल्यास छोटे व्यवसायिकांना दिलासा मिळू शकतो.

चार रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी होणार

दरम्यान, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात महारेल अंतर्गत कर्जत येथे तीन आणि नागोठणे येथे एक अशा चार रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. या कामांसाठी सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, ही कामे लवकरच सुरू होतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची एक मार्गिका सुरु होणार

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड येथील पथकर नाक्याला स्थगिती मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे. या मार्गिकेचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याची माहितीही तटकरे यांनी दिली.