• Sun. Aug 16th, 2026

Abhijeet Dipke : हायकोर्टच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपके मैदानात, विद्यार्थ्यांसह मांडला ठिय्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. हायकोर्टच्या टायपिंग परीक्षेसाठी आज शेकडो विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. पण या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या विद्यार्थ्यांना अभिजीत दिपके यांनी पाठिंबा दिला आहे. दिपके हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात हायकोर्ट टायपिंग परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातील विद्यार्थी उपस्थित होते. पण या परीक्षेत विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. काही विद्यार्थ्यांचा किबोर्ड खराब होतो, तर काहींना इतर तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर ठिय्या मांडला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनस्थळी दाखल झाले.

अभिजीत दिपके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी बातचित केली. तसेच पुन्हा परीक्षा व्हावी आणि ती ऑफलाईन व्हावी, अशा मागणीसह आंदोलकांनी ठिय्या मांडला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अभिजीत दिपके यांनी पाठिंबा दिला. अभिजीत दिपके हे सुद्धा विद्यार्थ्यांसह ठिय्या मांडून बसले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

“आज इथे हायकोर्टाची परीक्षा होती. या परीक्षेसाठी खूप दुरुन मुलं-मुली आले होते. बीड, आंबेजोगाई, अमरावती येथून मुलं परीक्षेसाठी आले आहेत. मुलं परीक्षेला बसले तेव्हा त्यांना लक्षात आलं की, इथे जे कम्प्युटर आहेत ते नीट काम करत नाहीत. कुणाचं किबोर्ड काम करत नाही तर कुणाची स्क्रिन काम करत नाही. दहा मिनिटांच्या आत सगळेच विद्यार्थी लॉगआऊट झाले. याचा अर्थ सर्व्हरही चांगलं काम करत नव्हतं”,

“मी पहिल्यांदाच बघतोय की, सर्व विद्यार्थ्यांना फेल करण्यात आलं आहे. हे विद्यार्थी फेल झाले नाहीत तर सिस्टम फेल झाले, सरकार फेल झाले आहे. इतक्या दुरुन विद्यार्थी येत आहेत, या विद्यार्थ्यांना सांगत आहेत की, तुम्हाला परीक्षा देण्याची अक्कल नाही का? प्रशासनाला अक्कल नव्हती का? आधीर सर्व्हर ठिक करण्याची ह्यांना अक्कल नव्हती का?”, असे सवाल अभिजीत दिपके यांनी केले.

अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा

“सरकारला अक्कल नाही आणि इतक्या दुरुन आलेल्या गरीब घरातील विद्यार्थ्यांची अक्कल काढत आहेत. मुलांची मागणी आहे की, पुन्हा परीक्षा झाली पाहिजे. ती तातडीने झाली पाहिजे. तिचं लगेच नोटीफिकेशन आलं पाहिजे. दोन शिफ्ट बाकी आहेत. जोपर्यंत जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश बाहेर येऊन पुन्हा परीक्षा घेणार असल्याचं लिखीत आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत इथून कुणीच सरकणार नाही”, अशी भूमिका दिपके यांनी जाहीर केली.

ऑनलाईन परीक्षावरुन अभिजीत दिपकेंचा निशाणा

“जिकडे तिकडे ऑनलाईन परीक्षा घेत आहेत. पण तुमची ऑनलाईन परीक्षा घेण्याची लायकी आहे का? एक परीक्षा दाखवा, जिथे तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय परीक्षा घेतली असेल. तुमची ऑनलाईन परीक्षाा घेण्याची लायकी नाही तर विद्यार्थ्यांचं भविष्य खराब कशाला करता?”, असा सवाल त्यांनी केला.

अभिजीत दिपके देखील ठिय्या आंदोलनात बसले

“या मुलांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मी याच मुलांसोबत बसून राहीन. ह्यांनी ठरवलं आहे इथे बसायचं तर ह्यांचं समर्थन करण्यासाठी मी इथे बसलो आहे”, असं अभिजीत दिपके म्हणाले.