- दोन्ही विभागांच्या माध्यमातून संयुक्त सर्वेक्षण करणार
मुंबई, दिनांक १२ :-जलसंपदा विभागाच्या धरणांमध्ये मत्स्यपालन व मासेमारीसंदर्भात मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहकार्य आणि समन्वय वाढवण्यात येणार आहे. स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देता यावे यादृष्टीने दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली संयुक्त समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात येईल , असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे, आमदार प्रकाश सावंत, प्रधान सचिव रामास्वामी एन, लाभक्षेत्र विकास सचिव प्रकाश मिसाळ, मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, जलसंपदा आणि मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पुढे म्हणाले, विभागाने उजनी धरणातील मासेमारी विकाससाठी प्रक्रिया राबविण्यासाठी सुरुवात केली गेली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विभागातील अशा धरणांची माहिती देखील एकत्रित केली जाईल. जलसंपदा आणि मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या वतीने संयुक्तरित्या अशा धरणांच्या माहितीचा सर्वेक्षण आणि विश्लेषण करून कार्यवाही करण्यास गती देण्यात येईल. यासाठी जलसंपदा विभागाच्या चारही मुख्य अभियंता यांना जबाबदारी देण्यात येत असून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यामधील धरणांमध्ये मासेमारीच्या दृष्टीने आवश्यक माहिती एकत्रित केली जाईल.
स्थानिक मच्छीमारांना मासेमारीसाठी संधी मिळावी यादृष्टीने विभाग प्रयत्नशील – मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे
मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे म्हणाले, जलसंपदा विभागाशी समन्वय राखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त यांना जबाबदारी देण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने जवळपास 2500 धरण आणि तलाव यातील मासेमारीसाठी मच्छीमारांच्या सहकारी संस्थांना संधी दिली जाते. विभागाने याबाबत पारदर्शक व आधुनिकता आणण्यासाठी डिजिटायझेशन, मॅपिंग केले गेले आहे आणि रियल टाईम डाटा सर्विसलेन्स प्रणाली कार्यरत केली आहे. जलसंपदा विभागाच्या विविध धरणांमध्ये देखील स्थानिक मच्छीमारांना मासेमारीसाठी संधी मिळावी यादृष्टीने विभाग प्रयत्नशील आहे असे मंत्री राणे म्हणाले.
जलसंपदा विभागाच्या अंतर्गत धरणांमधील गाळ काढण्यासाठी व जल साठवण क्षमता वाढविण्यासाठी कार्यवाही केली जाते त्या मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या धरणातील व तलावातील गाळ काढण्याची कार्यवाही व्हावी असे मंत्र राणे म्हणाले.
यावेळी गोड्या पाण्यातील मासेमारी, सहकारी मच्छीमार संस्था, तलावातील मासेमारीसाठी ठेका पद्धती, दोन्ही विभागांशी संबंधित विविध बाबी, मासेमारीसाठी राबविण्यात येणारी प्रक्रिया आदी विषयाबाबतही चर्चा झाली.
0000
किरण वाघ/विसंअ