मुंबई, दि. ६ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदांची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने करण्यात येत असून, यासाठी राज्यभरातील ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) -२०२५ ही ऑनलाईन पद्धतीने २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या चाचणीसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले असून १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५१, महानगरपालिकांच्या १ हजार ९५४, नगर पालिका/ परिषदांच्या २८० तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांच्या १२ हजार १४८, याशिवाय आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील २ हजार ४२१ आणि शासकीय विद्यानिकेतन मधील ५६ अशा एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती मागणी नोंदविण्यात आली आहे. यामधील १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय तर खाजगी संस्थांमधील १०,३२८ पदे मुलाखतीसह भरावयाची आहेत.
या पदांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या १४ हजार ३२० पदांचा, इयत्ता सहावी ते आठवीच्या १०,०१२ पदांचा, इयत्ता नववी व दहावीच्या पाच हजार ५१३ पदांचा तर इयत्ता ११ वी व १२ वीच्या ३६४ पदांचा समावेश आहे.
उमेदवारांना पदभरतीसाठी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी आवश्यक सुविधा ६ ऑगस्ट २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत लॉक करणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांसाठी गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.
पदभरती प्रक्रियेशी संबंधित सूचना, मागण्या किंवा तक्रारी उमेदवारांनी [email protected] या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहनही शालेय शिक्षण आयुक्तांनी केले आहे.
00000
बी.सी.झंवर/विसंअ
