• Mon. Jul 20th, 2026

    ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 19, 2026
    ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी झालेल्या वारकरी भाविकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत व्यापक आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येत असून, ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात आहे. आजपर्यंत ३ लाख ८३ हजार ६४३ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे. ३ लाख ८० हजार ४८५ बाह्यरुग्णांवर उपचार, ३ हजार १५८ रुग्णांना आंतररुग्ण सेवा आणि ८८३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.

    वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ सुसज्ज आयसीयू, १५६ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि ३०२ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. पंढरपूरमध्ये २४ तास कार्यरत आयसीयू, ३ दिवसांचे महाआरोग्य शिबिर, तसेच यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण असलेली एअर ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

    याशिवाय पालखी मार्गावरील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया आदी कीटकजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, हॉटेल व धाब्यांमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, वारीनंतर विशेष स्वच्छता मोहीम, असंसर्गजन्य आजारांची तपासणी, आरोग्य जनजागृती तसेच ‘आरोग्यसंपन्न वारी’ डिजिटल ॲपच्या माध्यमातून तातडीच्या आरोग्य सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

    राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग वारकऱ्यांना सुरक्षित, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, वारीच्या संपूर्ण कालावधीत आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed