• Sun. Jul 19th, 2026

    संध्याकाळी 5 पर्यंतची मुदत, मालमत्ता जप्तीचा इशारा; शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक पोलिसांना शरण

    संध्याकाळी 5 पर्यंतची मुदत, मालमत्ता जप्तीचा इशारा; शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक पोलिसांना शरण

    Ramesh Mhatre: शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आला आहे. डोंबिवली डॉक्टर प्रकरणात कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर म्हात्रेनं पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ला प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर शिंदेसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे अखेर विष्णूनगर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. न्यायालयानं संध्याकाळी ५ पर्यंतची मुदत दिली होती. त्याच्या काही तास म्हात्रेनं पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

    कल्याण न्यायालयानं रमेश म्हात्रेला दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला. अनेक गुन्हे नावावर असलेल्या रमेश म्हात्रेला जामीन देणाऱ्या कल्याण न्यायालयाबद्दल उच्च न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलं होतं. १९ जुलैच्या संध्याकाळी ५ पर्यंत पोलिसांसमोर हजर न झाल्यास मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी रोखठोक भूमिका न्यायालयानं घेतली. न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर रमेश म्हात्रे पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कल्याण न्यायालयात नेलं आहे. उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर कल्याण न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

    डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी डॉक्टरांवर हल्ला झाला. रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरांवर हात उगारला. या प्रकरणी कल्याण न्यायालयानं म्हात्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे आधारवाडी तुरुंगात असलेल्या म्हात्रेच्या सहकाऱ्यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. सोबतच म्हात्रेला दिलासा मिळाला. म्हात्रे विरोधात १८ गुन्हे दाखल असले तरीही १७ गुन्ह्यांत त्याची निर्दोष सुटका झालेली आहे. म्हात्रे आजारी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असा युक्तिवाद म्हात्रेच्या वकिलांनी केला होता. त्यानंतर न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला होता. पण उच्च न्यायालयानं म्हात्रेला दणका देत त्याचा जामीन रद्द केला.

    डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. इंडियन मेडिकल असोसिएशननं या घटनेचा निषेध करत २० जुलैला राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. पण उच्च न्यायालयानं म्हात्रेचा जामीन रद्द केल्यावर संघटनेनं बंद मागे घेतला. पोलिसांसमोर शरणागती पत्करणाऱ्या रमेश म्हात्रेला न्यायलयीन कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा