• Mon. Jul 20th, 2026
    Aditya Thackeray: आता कापलं तरी भाजपसमोर झुकणार नाही; मुंबईतून आदित्य ठाकरेंचा एल्गार, पुढचा प्लॅनही सांगितला!

    मुंबई: नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर इथं उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने उपोषणस्थळाहून हटवल्यानंतर वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर घणाघाती टीका करत आधी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची आपली मागणी असणार असल्याचं म्हणत एल्गार पुकारला आहे. तसंच मुंबईतील आंदोलनानंतर आता दिल्लीतील आंदोलनकर्त्यांचीही आपण भेट घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

    सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “नीट, टीईटी असे एकामागोमाग एक पेपरलीक होत आहेत. एमपीएससीसाठीही दरवर्षी आंदोलनं करावी लागत आहेत. देशातील जनतेला अशिक्षित ठेवून अंधभक्त बनवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण आम्ही अंधभक्त होऊ तर या देशाच्या मातीचे होऊ, आम्ही अंधभक्त छत्रपती शिवरायांचे होऊ, आम्ही अंधभक्त शाहू-फुले-आंबेडकरांचे होऊ. ज्यांनी आपल्याला संविधान दिलं त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही अंधभक्त होऊ. पण भाजपसमोर वाकणार नाही, झुकणार नाही. कापलं तरी चालेल पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही,” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपविरोधात आगामी काळात आपण आणखी आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले.

    “आधी मंत्री प्रधान आणि नंतर प्रधानमंत्री यांचा राजीनामा”

    सध्या शिक्षण क्षेत्रातील गोंधळावरून देशातील जनतेकडून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असली तरी आगामी काळात थेट पंतप्रधानांचा राजीनामा मागावा लागेल, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. “आपण सगळे इथं सोनम वांगचुक या आपल्या हिरोसाठी जमलो आहोत. इथं कोणत्याही एका पक्षाचे लोक आलेले नाहीत, तर विविध संघटनांचे लोक आले आहेत. सगळ्या विषयांवर आपलं एकमत कदाचित होणार नाही, पण एका विषयावर आपलं एकमत होऊ शकतं आणि ते म्हणजे देशाच्या भविष्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावंच लागेल. देशभरात सगळे युवा रस्त्यावर उतरले आहेत ते शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. आज आपण मंत्री प्रधानचा राजीनामा मागतोय, पण उद्या हे उलटं करून प्रधानमंत्रीचाही राजीनामा मागायला आपण मागेपुढे पाहणार नाही,” असं ते म्हणाले.

    आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

    – ज्या लोकांना देश बदलण्यासाठी लोकांनी बहुमत दिलं होतं, तेच लोक आज संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

    – एकीकडे इस्त्रोचे १०० शास्त्रज्ञ राजीनामा देऊन बाहेर पडत आहेत. या सरकारला इस्त्रो सांभाळता येत नाही, पण सरकारमधील लोक दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडत आहे. असे सरकार तुम्हाला मान्य आहे का?

    – २०१४ पर्यंत आपण ‘सबका मालिक एक है’ हे साईबाबांच्या बाबतीत ऐकत होतो. पण आता भाजपला विचारलं तर ते म्हणतात सबका मालिक अदानी है.

    – महाराष्ट्रातील एक तरुण मुलगा जो अमेरिकेत काम करत होता त्या अभिजीत दिपकेबद्दल आम्हाला अभिमान आहे. जसा सोनम वांगचुक यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, तसाच अभिजीतबद्दल अभिमान आहे. त्यांना भेटायला मी जाणार आहे. पण आम्ही असं ठरवलं होतं की, आधी आपण महाराष्ट्रात आंदोलन करून दाखवू, नंतर त्यांना दिल्लीत भेटायला जाऊ.